एनआयपीएम तर्फे तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
पुणे: :सकारात्मक दृष्टिकोन आणि मुक्त संवादशैलीचा अवलंब केल्याने तणावमुक्ती सहज शक्य आहे, असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते विवेक डोबा यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे पुणे शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘तणाव व्यवस्थापन’ कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना विवेक डोबा म्हणाले की, सध्या प्रत्येकाचे जीवन प्रचंड धावपळीचे व स्पर्धेचे बनले आहे, प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दररोज आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागते. मात्र सकारात्मक विचार, कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक कामाचे व्यवस्थित नियोजन व सर्वांशी मुक्तपणे संवाद साधण्याची कला विकसित करणे आवश्यक आहे.
आपल्याला असलेली अडचण, जाणवणारी समस्या मोकळेपणाने व्यक्त न केल्याने मनातील घुसमट वाढत जाते आणि पर्यायाने त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊन सर्वांगीण प्रगती साधण्यास अडथळा निर्माण होतो. आपण स्वतःविषयी व इतरांविषयी नकळतपणे करून घेतलेले पूर्वग्रह यामुळेसुद्धा बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. समस्येविषयी व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा उपाययोजनेविषयी विचार करून कृतिप्रवण होणे गरजेचे आहे असेही डोबा यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थितांना बोलतं करून तणावाच्या घटना, कारणे आणि उपाय यावर विविध उदाहरणांसह मनोरंजनात्मक खेळाची प्रात्यक्षिके करून डोबा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्राचे प्रास्ताविक करताना एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे यांनी सांगितले की,व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर तणावाचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता, प्रयत्नपूर्वक प्रत्येकाने तणाव व्यवस्थापन करणे हे हिताचे आहे.
याप्रसंगी डॉ. अभिजित शहा, डॉ. नागेश कुमार, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ.वैशाली साकोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच. डी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुरभी जैन यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागाच्या प्रमुख पदी (पुम्बा) निवड झाल्याबद्दल तर डॉ. पराग कालकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागाच्या अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल आणि डॉ. गंगाधर शिरुडे यांची श्री बालाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एनआयपीएमच्या कार्यकारी समितीच्या सदस्य अमृता तेंडुलकर, एनआयपीएम पुणे कार्यालयाचे पदाधिकारी वसंत सोमण व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. तर पवन शर्मा,प्रशांत कुलकर्णी, अमला करंदीकर, कल्पेश पाटील, अभिजित चव्हाण आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.