पुणे -जुन्या नव्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्या भावना जाणून ,प्रश्न जाणून कशा पद्धतीने कॉंग्रेसची वाटचाल असावी यासाठी आज महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी बोलाविलेल्या बैठकीत अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे उर दाटून आले. तर अनेकांनी कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक विचारणा करणाऱ्या या उपक्रमाबाबत आबा बागुल यांना धन्यवाद देऊन आपापली गाऱ्हाणी मांडत नेत्यांना कान पिचक्या देखील दिल्या .आज वर सातत्याने असे उपक्रम का घेतले नाही , कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले तर कॉंग्रेसचे गतवैभव निश्चित पुन्हा प्राप्त करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल असे नमूद केले.
महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या वतीने महापालिकेच्या आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासमवेत शनिवार दि.२१/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन . उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीसाठी १९९२ ते २०१७ या कालावधीतील ८० हून अधिक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर मोहन जोशी, डॉ.सतीश देसाई माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन,बुवा नलावडे, जयसिंगराव भोसले , काका धर्मावत, भीमराव पाटोळे, संगीता तिवारी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, र विंद्र धंगेकर, रफिक शेख, कैलास गायकवाड, सौ.सुजाता शेट्टी, सौ.वैशाली मराठे, माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी, मिलिंद काची, बाळासाहेब मारणे, अनिल सातपुते व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा र.रु. ९१८ कोटीचा हिस्सा असणार आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेचे ४० हजार कोटी बजेट असून देखील मुंबई व नागपूर या दोन्ही महानगरपालिकांनी कुठलेही पैसे मेट्रो प्रकल्पासाठी दिलेले नाहीत. पुणे महानगरपालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी आपला हिस्सा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करून पुणे मनपाने हिस्सा देवू नये यासाठी राज्य सरकारकडे कॉंग्रेस प्रयत्न करणार आहे असे आबा बागुल यांनी सांगितले.
पीएमपीएमएल कंपनी तयार होवून देखील परिवहन महामंडळ तोट्यात आहे. महापालिकेला पीएमपीएमएलच्या तुटीपोटी दरवर्षी र.रु.२०० कोटी निधी द्यावा लागत आहे. २०० कोटी तुट देण्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे . पुणे मनपाची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो बरोबर पूर्वीप्रमाणे पी.एम.पी.एम.एल ऐवजी पी.एम.टी. सुरू केली तर त्यावर मा.मुख्य सभेचे नियंत्रण राहील असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. शहरातील वाहतुकीची समस्या निवारण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला एच.सी.एम.टी.आर.प्रकल्प उभा राहण्यासाठी मी सतत लढा देत आहे. अजून किती नागरिक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे याचा जाब प्रशासनाला पुणेकरांनी विचारला पाहिजे. तसेच शहरातील २००० कि.मी. चे रस्ते रुंद करणे आवश्यक असून यामुळे शहरातील वाहतूक समस्यांचे निराकारण होणार आहे.
रस्ता रुंदी भूसंपादन करणेसाठी अंदाजे महापालिकेला ६० हजार कोटी आवश्यक आहेत. शासनाने पाटबंधारे विभागास दिलेल्या सवलतीच्या आधारावर अॅडव्हांस रक्कम भरणेस पुणे महानगरपालिकेला सवलत द्यावी असे आबा बागुल म्हणाले.
महापालिकेत अनेक वर्षानंतर आलेल्या माजी नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक आजी माजी सदस्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू तराळले. दिवाळीच्या फराळाचा गोडवा घेवून पुन्हा एकदा पुणे शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने कॉंग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी काम करण्याच्या आशा यावेळी पल्लवीत झाल्या. याप्रसंगी सर्व आजी माजी नगरसेवक हे ‘साक्षीदार आहेत गतवैभवाचे, पुन्हा बनतील शिल्पकार पुण्याच्या विकासाचे असे आबा बागुल म्हणाले.
त्यामध्ये डॉ. सतीश देसाई यांनी या बैठकीच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व जुन्या आठवणीना उजाळा मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. कॉंग्रेस पक्षाचा मुख्य शत्रू हा कॉंग्रेसच आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. पक्षाला उभारणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त त्यांनी केले.
आमदार उल्हासदादा पवार यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीना सामोरे जात जात पक्षाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. आपली कामे जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर प्रभावीपणे करावा तसेच पद नसले तरी संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ओळख आहे. पदाची अपेक्षा न ठेवता नेता बनण्याआधी कार्यकर्ता व्हायला शिका असे सर्वाना त्यांनी मार्गदर्शन केले.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका अस्तित्वात आणावी त्यामुळे त्या भागाचा विकास होवू शकतो. आत्ताच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास खुंटला आहे असे मत व्यक्त त्यांनी केले.
महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात करावी असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
नवीन वर्षात जानेवारी २०२१ पासून प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी माजी नगरसेवक यांनी आपल्या भागातील समस्या, सूचना या १५ दिवस अगोदर मांडाव्यात असे सर्व उपस्थित सदस्यांना आबा बागुल यांनी आवाहन केले.वीरेंद्र किराड यांनी आभार मानले .(या व्हिडीओ त आबा बागुल यांचे भाषण काही तांत्रिक कारणास्तव रेकोर्ड होऊ न शकल्याने देऊ शकलेलो नाही )