म्हणाले, जनतेच्या पैशावर सण करणे थांबवा….
पुणे- २४ तास समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली गेली सुमारे ६ वर्षापासून महापालिका प्रशासन नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करत असताना आता प्रशासकांनी त्यावर कडी केली आहे , पाण्याच्या नळाला मीटर बसविण्याची कार्यवाही अत्यंत घाईने सुरु केली आहे . २४ तास समान पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत कोणतेही उत्तर नसताना मीटर बसवून कोणाचे उखळ पांढरे करण्यात येत आहे असा आरोप करत हि घाई कशासाठी असा सवाल महापालिका आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांनी केला आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली सेल पदाधिकार्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट मागणीचे निवेदन दिले. यावेळी सेलचे स्वप्निल दुधाने, गणेश नलावडे, स्वप्निल खडके, मदन वाणी, प्रशांत गांधी, प्रमोद इंदापूरकर, सुमित मोरे, राजाभाऊ घोलप, मच्छिंद्र उतेकर, प्रमोद शिंदे, चंदन जगताप आदी उपस्थित होते.
याप्रकरणी कदम यांनी सांगितले कि,’ राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या, पाईप लाईन हे पायाभुत कामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. असे असताना कर्ज काढून पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. काम पूर्ण होण्यास नेमका किती वेळ लागणार आहे, हे सांगता येत नाही. मग कर्ज काढून खरेदी केलेल्या मीटरच्या व्याजासाठी पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी नेकमी कोणाचे मीटर चालवण्यासाठी केले जात आहे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी अर्बन सेलने ऋण काढून सण करणे थांबवा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे मीटर बसविल्यानंतर लगेच शहरातील नागरिकांना अतिरिक्त पाणीवापर करत असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने नोटिस देण्यात आल्या. या योजनेंतर्गत घरोघरी पाणी मीटर बसवण्याच्या अगोदर महापालिकेच्या विविध इमारती आणि कार्यालयांमध्ये पाणी मीटर बसविणे गरजेचे आहे.शहराला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. मात्र कालानुरूप शहराची हद्द व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. शहराच्या वाढीव हद्दीचा आणि लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करून घेणे गरजेचे आहे.
विविध जलशुध्दीकरण केंद्रांना पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनी व विविध परिसराना पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण खराब झाल्या आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. काही परिसरांत जलवाहिन्या टाकून एक ते दोन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप त्यांची तपासणी (टेस्टिंग) झालेली नाही.
योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत. कामे पूर्ण झालेल्या टाक्या विनावापर स्थितीत आहेत. त्यामुळे त्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या टाक्या त्वरित नागरिकांच्या सेवार्थ सुरू कराव्यात. योजनेतील कामे अपूर्ण स्थितीमध्ये असूनही मीटर बसविण्याची घाई महापालिकेकडून का केली जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या पैशाचा वापर पाणी मीटर खरेदीसाठी करावा. त्यामुळे पुणेकरांना व्याजाची वाचेल.
दरम्यान, योजनेंतर्गत बसविण्यात येणारे मीटर व त्याचे मटेरियल यांच्या दर्जाबाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच मीटर बसविणारे कर्मचारीदेखील प्रशिक्षित नसल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईनमधून पाणी गळतीचे प्रकार पहायला मिळत आहेत. तरी हे मीटर बसविणार्या व मुख्य लाईनला पाईप जोडणार्या कर्मचारी यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य त्या तपासण्या कराव्या, अशा मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना करण्यात आल्या आहेत.