पुणे- श्वानांच्या बाबतीत महापालिका आपली जबाबदारी प्रभावी पद्धतीने राबवीत नसल्याने श्वानांच्या आम्नी नाग्रीकांच्यात संघर्ष वाढत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार ,पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी केला आहे .
या संदर्भात त्यांनी पाठविलेले प्रसिद्धी पत्रक माही येथे जसेच्या तसे देत आहोत ..
वाचा …
प्राणी व माणूस यामधील संघर्ष सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. शहरांमध्ये दिवसेंदिवस भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. श्वानांचे लसीकरण तसेच नसबंदी करणे त्यांच्या आरोग्याच्या व त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे व ती जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे. गेल्या काही वर्षांत हि जबाबदारी प्रभावी पद्धतीने राबविली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे व यामुळे श्वानांच्या व नागरिकांच्यात एक प्रकारचा संघर्ष वाढत असल्याचे आढळते.
काल दि. १५ जानेवारी २०२१ रोजी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती व डॉ. प्रकाश वाघ यांची भेट घेऊन प्राण्यांच्या आरोग्याची हेळसांड न होता त्यांचे लसीकरण व नसबंदी अधिक प्रभावी पद्धतीने होण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
यावेळेस खा. वंदना चव्हाण, अर्बन सेलचे पुण्याचे समन्वयक श्री. नितीन कदम, SAS संस्थेचे अध्यक्ष श्री. नितेश खरे, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा मनाली भिलारे, अर्बन सेलचे पुण्याचे सदस्य श्री. नितीन जाधव उपस्थित होते.
या बैठकीत पुढील सूचना आम्ही केल्या :
पुण्यात प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय लसीकरण व नसबंदीचा कार्यक्रम राबवावा.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाला निदान एक श्वान वाहन उपलब्ध करून द्यावे. सोबत हि मोहीम राबवीत असताना नेमण्यात येणाऱ्या श्वान पथकात एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी असावा.
लसीकरण व नसबंदी करण्याच्या प्रक्रीयेनंतर श्वानांना त्यांच्या मूळ आदिवासाच्या ठिकाणी सोडावे व त्याची माहिती संकलित करून सार्वजनिक करावी.
अनेक प्राणीप्रेमी भटक्या श्वानांना अन्नदान करतात परंतु अन्नातील काही जिन्नस या प्राण्यांना अपायकारक असतात असे निदर्शनास आले आहे, तसेच त्यांना खायाला देण्याची पद्धत व जागा सुद्धा अयोग्य असल्याचे देखील लक्षात आले आहे. मार्गदर्शक नियमावली प्रमाणे प्राण्यांचे संगोपन व अन्नदान कश्या पद्धतीने करावयाचे हे निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राणी व नागरिक यांच्यात कोठेही संघर्ष होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. तरी या नियमावलीचे महानगरपालिकेने कटाक्षाने पालन करावे असे सूचित केले.
सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणांच्या मलमूत्र विसर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी सुद्धा नियमावलीमध्ये तरतुदी आहेत, त्यासंदर्भात सुद्धा जनजागृती व अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कळावे,
आपली,
वंदना चव्हाण
खासदार, राज्यसभा