पुणे : महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने २ जुलै रोजी मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखाना 65 कोटिना घेतला आणि त्यावर 700 कोटींचे कर्ज घेतले.शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का ? जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिम्मत अजित पवार का दाखवत नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.
शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी हा महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या डर्टी एलेव्हन मध्ये जितेंद्र आव्हाड या बाराव्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्याबाबतचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
काय आहे नेमकं प्रकरण ?
सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.
सोमय्या म्हणाले, एखादी खासदार व्यक्ती ११८ कोटी एवढी मोठी रक्कम बँकेतून काढते कसे? शरद पवार तुम्ही गवळींना वाचवत आहात. गवळी यांना वाचवायचं असेल तर पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. मात्र, शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी मी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणारच आहे अशा शब्दात सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
गणेश विसर्जनानंतर बारामतीतून विसर्जनाची प्रक्रिया होणार …
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे डाकूंचं सरकार आहे असल्याची टीका करतानाच सोमय्या म्हणाले, मी पुण्यात तक्रार नोंदवली आहे. मला याविषयी योग्य प्रतिक्रिया मिळाली की, मी ‘तिसऱ्या अनिल’चं नाव घोषित करणार आहे. गणपती तर नीट जाऊ द्या. गणेश विसर्जनानंतर विसर्जनाची प्रक्रिया बारामती येथून होणार असल्याचे म्हणत एकप्रकारे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे.
आगे आगे देखो होता है क्या…
छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त केल्याबद्दल विचारलं असता किरीट सोमय्यांनी आगे आगे देखो होता है क्या, असं शायरीतूनचं उत्तर दिलं. कितीही अटॅक करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही सोमय्या म्हणाले.
भाजपचा आरोप आणि भावना गवळींच्या संस्थांवर ईडीची कारवाई
यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या तक्रारीनंतर यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने कारवाई केली होती. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या.