पुणे- लॉकडाऊन करून आणि आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून कोरोनापासून पुण्याला तुम्ही मुक्ती मिळवून देणार आहात काय ? असा सवाल आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होऊ लागला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली तर अनेकांच्या पचनी पडलेली नाही . गायकवाड यांनी पुण्याच्या पोलिसांसह,अनेक अमहाराष्ट्रीयन अधिकारी यंत्रणाच्या मुसक्या बांधून आपल्या कार्यशैलीने लोकांना धीर देत कोरोना चा मुकाबला सुरु ठेवला होता. औषध उपलब्ध होत नाही तोवर कोरोना सोबत जगावे लागेल आणि त्यासोबत जगण्यासाठी आपल्याला आपली जीवन शैली बदलावी लागेल असे ते वारंवार सांगत होते .गायकवाड यांची बदली म्हणजे त्यांना बळीचा बकरा बनविल्याचे आज सर्वत्र बोलले जात होते. अशा मराठी विनाकलंकित आणि लोकप्रिय अधिकाऱ्याला बळीचा बकरा नेमके का बनविले ? असा सवाल आज वारंवार उपस्थित होत होता. अमराठी आय ए एस अधिकाऱ्यांच्या लॉबीला तर दादा बळी पडले नाहीत .?आज पुण्यातील पथारीवाल्या पासून बड्या व्यापाऱ्यापर्यंत अनेक कंपन्यांच्या कामगारांना आणि उद्योगांना लागलेली झळ जाणून होते .आणि हाच सारा वर्ग या मराठी अधिकाऱ्याच्या अशा तडकाफडकी बदलीने अचंबित झाला आहे. अगोदरच पोटाची भ्रांत , नौकरीची चिंता त्यात आता नव्याने येणारे लॉकडाऊन नवे अधिकारी कसे असतील या या प्रश्नांनी पुढील काळात लोकांत दुही माजू नये याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.
दादांच्या लॉकडाऊन निर्णयाबाबत कोण कोण काय म्हणाले
गिरीश बापट, खासदार पुणे.
पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यात कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही. सरकार आम्हाला राजकारण करू नका असे एकीकडे सांगताना असे निर्णय राजकीय अभिनिवेशातून घेतले आहेत काय अशी मला शंका यायला लागली आहे. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने असे धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले आहे. आधी अचानक लाॅकडाऊन आणि आता प्रमुख अधिकाऱ्यांची बदली ही चुकीची गोष्ट करण्याची मालिका आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. –
शेखर गायकवाड यांची बदली दुर्दैवी –
पुणे महापालिका व आरोग्य विभाग यांचे प्रशासन अत्यंत ‘डलहौसी’ झालेले आहे. खुर्चीला चिटकून बसलेले बरेच अधिकारी व कर्मचारी ‘मलिदा’ खाण्यासाठी खुर्च्या सोडत नाहीत. पुणे जिल्ह्यातील सर्व खात्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी एकाच जागेवर १० ते १५ वर्षांपासून फेविकॉल सारखे चिटकून बसलेले आहेत. त्यांना सर्वप्रथम जिल्ह्याबाहेर आऊट केलं पाहिजे. कारण या महाशयांची जरी बदली झाली तरी दोन-चार महिने दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत पहिल्या जागेवर येउन बसतात. यांची स्वतंत्र मोनोपोली (सवतेसुभे) तयार झालेली आहेत. 100% काम करून सुद्धा १ – २ टक्क्यांवरून आज राजकीय आशीर्वादाने त्याच जागेवर असल्यामुळे 10 टक्केच्या वर मागणी करतात. उपमुख्यमंत्री अर्थात पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी अगोदर सगळ्या खात्यांमध्ये वर्षानुवर्षे चिटकून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. कोरोना महामारी सुद्धा याच लोकांच्या निष्क्रिय प्रशासन कारभारामुळे रुग्ण वाढत आहेत. पालकमंत्र्यांनी मनपा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, महसूल व इतर विभागातील प्रशासनाला लागलेली कीड सर्वप्रथम घालवावी.महानगरपालिकेत सुद्धा बरेच अधिकारी खुर्च्यांना चिटकून आहेत. राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्यामुळे सर्रास टोलधाड सुरू आहे. लाखोंचे व्यवहार मर्जीतल्या लोकांचे असल्यामुळे त्यांना त्या पदावरून अथवा पैशाच्या टेबल वरून हटवलं जात नाही. त्यामुळे पवार साहेबांनी अशा खुर्चीला चिटकून बसलेल्या (लांडग्याच्या) कर्मचाऱ्यांच्या सर्वप्रथम बदल्या कराव्यात जेणेकरून लोकांना न्याय मिळेल. सर्व खात्यातील बदल्यांचे ‘सनीटाईज’ करून प्रस्थापित घाण काढली पाहिजे…
पुणे मनपा आयुक्तांची झालेली बदली दुर्दैवी आहे. कारण आलेले आयुक्त कोरोनाला घाबरतात अशी चर्चा आहे. ‘आम्हाला जगायचय… म्हणून आम्हांला घाबरट आयुक्त नकोत.’
- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड
सिद्धार्थ धेंडे (नेते, रिपाइं) :
लॉकडाऊनमुळे आर्थिक दुर्लब घटकांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले आहेत. घरकामगार महिला, रिक्षाचालक, मजूर, कष्टकरी कामगार यांना एक महिन्याचे रेशन शासनाने भरून द्यावे. त्यानंतर लॉकडाऊनचे असे निर्णय घ्यावेत.
विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच) :
बेशिस्तांना आवर आता तरी कसा घालणार? कंटेनमेंट झोनमधे कडक लाॅकडाऊन आहेच की कित्येक दिवस, मग तरी का तिथे प्रसार वाढला? जर प्रशासन कंटेनमेंट झोन मधे कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात कमी पडतंय तर अख्ख्या जिल्हयात खरंच कडक लाॅकडाऊन होईल? आणि झालाच तर 10 दिवसांनी पुढे परत ये रे माझ्या मागल्या होणार नाही याची काय खात्री? आज साखळी तुटली पाहीजे असं सांगतायत हेच 23 मार्चला ऐकलं होतं.
युक्रांद राज्य संघटक जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे, कार्यवाह सुदर्शन चखाले :
गेले ११३ दिवस आपण लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहोत, तरीही रुग्ण वाढत आहेत म्हणजेच लॉकडाऊन हे निष्फळ ठरले आहे. आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन हा पर्याय युवक क्रांती दलाला योग्य वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाची सोय न करता लॉकडाऊनच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे.
आपण घेतलेल्या १० दिवसीय लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा जगण्या-मरण्याचे प्रश्न निर्माण
होतील. सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्याचे प्रमाण वाढु शकेल असे आम्हास वाटते. तसेच बाहेर गावाहुन नोकरीसाठी परत आलेल्या लोकांचे हाल होतील. लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर सरकार ठामच असेल तर नागरिकांच्या जिवनावश्यक वस्तु पुरविण्याची जबाबदारी सुध्दा सरकारचीच आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा.