पुणे -शहरात स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची साथ वाढत असताना सत्ताधारी निविदा काढण्यात गुंग व प्रशासन पूर्णतः गप्प असल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.
ते म्हणाले,’ पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिक सुटकेचा श्वास घेत असतानाच आता स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची साथ शहरात जोरात चालू आहे. परंतु त्याबाबतची कोणतीही खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नाही. कोरोनावर मात करत असताना इतर संसर्गजन्य आजारावर लक्ष देणे,नागरिकांना त्याबाबत जागृती करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही का? वेळीच उपाय योजना केल्यास शहरातील परिस्थिती आटोक्यात राहील. असे आबा बागुल म्हणाले.
त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयात सूचना देऊन लक्ष ठेवण्यास सांगणे,जागृती करणे तसेच शहरात स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची रुग्ण संख्या किती आहे. त्याची सविस्तर आकडेवारी घेऊन प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यावर उपाय योजना कराव्यात. ही साथ खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून शहरात त्याचा स्फोट होण्याअगोदर हालचाल करणे गरजेचे झाले आहे. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका सांगण्यात आला असून त्यासाठी देखील सज्ज राहावे लागणार आहे.
परंतु सत्ताधारी निविदा काढण्यात गुंग व प्रशासन पूर्णतः गप्प असून नागरिकांना पुन्हा मृत्यूच्या खाईत जाण्यापासून रोखण्यासाठी देखील तयार राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्यावर कोणत्या उपाय योजना करणार आहोत पुढील ऍक्शन प्लॅन काय असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती द्यावी असे आबा बागुल म्हणाले.