अखिल मंडई मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात सेवा देणारे स्वच्छता कर्मचारी आणि निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा
पुणे : आपल्याला नेमून दिलेले काम आपण सगळेच करतो. परंतु काही लोक हे आपले काम भक्ती समजून करतात. कामाचे स्वरूप भक्तिमय होते तेव्हा ते कार्य कर्तृत्व म्हणून नावाजले जाते. असे मत एअरमार्शल भूषण गोखले (नि.) यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणूकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिन्ही दलातील निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी आश्विनी भागवत, लोकमान्य मल्टीपर्पज बॅंकेचे हर्षद झोडगे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोषाध्यक्ष संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, सुरज थोरात, विकी खन्ना, दादा मोरे, संजय यादव, नारायण चांदणे यावेळी उपस्थित होते.
भूषण गोखले म्हणाले, पुण्याला सर्वात चांगले शहर समजले जाते. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील मोठे योगदान आहे. देशासाठी लढणारे सैनिक आणि स्वच्छता कर्मचारी हे भक्तीच्या भावनेतून आपले काम करत असतात. गणपतीवर भक्ती करणारे जसे कार्यकर्ते असतात तसेच भारत मातेची सेवा करणारे सैनिक हे देशाचे कार्यकर्ते आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अण्णा थोरात म्हणाले, विसर्जन मिरवणुकीनंतर सर्वत्र कचऱ्याचा खच पडलेले दिसतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर काही वेळातच पुण्यातील रस्ते चकाचक होतात. त्यामुळे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मान राखणं हे गरजेचे आहे.