श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे उत्पत्ति एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : संत सांगतात, दान देताना निरपेक्ष भावनेने द्या. जीवनात संपत्ती कमी मिळवा. मानवी देह तुम्हाला पुण्यप्राप्तीसाठीच मिळालेला आहे, त्यामुळे ते पुण्य मिळविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा, असे मत कीर्तनकार ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात उत्पत्ति एकादशीनिमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर म्हणाले, देह जाईल रे बा जाईल रे… पुण्य काम येईल रे… पुण्य मिळविण्याचे साधन म्हणजे आपले दोन हात आहेत. आपण समाजचे देणे लागतो म्हणून दान धर्म केला पाहिजे. परंतु त्या देण्यामागची भावना कशी आहे याला महत्त्व आहे.
ते पुढे म्हणाले, आपल्याच विश्वात जो गुरफटून रमतो त्याला संत मूर्ख म्हणतात. जोपर्यंत आहे तुमचा देह आहे, तुम्ही ऐश्वयार्संपन्न आहात, तोपर्यंत तुम्हाला मान सन्मान आहे. परंतु तुमच्या मृत्यू पश्चात देखील तुम्हाला तो मान मिळाला पाहिजे असे पुण्याचे काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.