पुणे- जनता वसाहती च्या नागरिकांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे . हाताला काम नाही ,पोटाला घास नाही अशा अवस्थेत भयाचे जिणे नशिबी आल्याने आणि पालिकेच्या प्रशासनासह सर्वांनींच पाठ फिरविल्याने हताश आणि असहाय बनलेल्या जनता वसाहतीच्या नागरिकांना घेऊन आपण महापालिकेच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा पर्वती मतदार संघाचे शिवसेना विभागप्रमुख सुरज लोखंडे यांनी दिला आहे .
लॉकडाऊननंतर तब्बल ६०दिवस कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जनता वसाहतीमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर वस्तीमध्ये कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कामासाठी बाहेर पडता येत नाहीये. हातावरील पोट असलेले नागरिक त्यामुळे हवालदिल झाले असून रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. मोलमजुरी करणाऱ्यांच्या जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून घरी बसून असलेल्या असंघटित कामगारांना आता रोजगाराचे वेध लागले आहेत.
एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
वसाहतीमधील सर्व किराणामालाची दुकाने, दुध, भाजीपाला बंद आहे. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करावी, पाच तास जीवनाश्यक वस्तू, दुध, भाजीपाला व धान्याची दूकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा कामगारांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी. जनता वसाहत मधील 14 हजार कुटुंबास अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात यावे अशी मागणी जनता वसाहत कृती समिती आणि शिवसेनेच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि विभाग प्रमुख सुरज लोखंडे उपस्थित होते.