मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. खरं तर हा निर्णय करायला राज्य सरकारने उशीरच केला आहे. परंतु तीनही पक्षात कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे. पुणेकरांनी पाच वर्षांपूर्वी टाकलेला विश्वास महापालिकेतील विकासकामांतून भाजपने सार्थ ठरविला आहे. मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे विकास आराखडा, मोठ्या प्रमाणात पीएमपीएमएल बसेसची खरेदी, उद्यानांची निर्मिती, सक्षम आरोग्य यंत्रणा, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती आदी इतकी वर्षे कागदावर असणारे प्रकल्प भाजपच्या कारकिर्दीत मार्गी लागले आहेत. कोविडच्या काळात महापालिका प्रशासन आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. याउलट राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पुणेकरांचा भ्रमनिरास केला आहे. पुण्यासाठी कोणतीही ठोस योजना सरकारला करता आलेली नाही. पुणे शहराला आजपर्यंत शून्य निधी उपलब्ध करून दिला. भाजपचे बूथप्रमुख, बूथसमिती, शक्तीकेंद्र प्रमुख आदी संघटनात्मक रचना पूर्ण झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घरोघरी संपर्क सुरू आहे. महापालिकेतील उत्तम काम, संघटनात्मक बांधणी, पुणेकरांचा विश्वास आणि राज्य सरकारचे अपयश यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे.
जगदीश मुळीक
अध्यक्ष शहर भाजपा ,पुणे