पुणे : सीमेवर लढणा-या आपल्या सैनिकांसाठी, त्यांच्या कार्याचा व वीरतेचा गौरव करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे राखी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. दुर्गा कॉफीच्या ५० शाखांच्या संकलन केंद्रांसह आॅनलाईन पद्धतीने देखील राखी व शुभेच्छा संदेश स्विकारण्यात येणार आहेत. अभियानांतर्गत जमा झालेल्या राख्या व शुभेच्छा संदेश थेट सिमेवरील सैनिकांना राखीपौर्णिमेपूर्वी पाठविण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, पुणेतर्फे पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, संयोजक डॉ. नंदकिशोर एकबोटे, लान्स नाईक संदीप इंदलकर आदी उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशासाठी लढणा-या आपल्या वीरांच्या त्यागा मागे पूर्ण देश उभा आहे, हे सैनिकांना सांगण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपले असंख्य सैनिक बांधव रात्रंदिवस आपल्या सीमांचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण आपल्या शहरात, घरात निर्धास्तपणे राहू शकतो. आपल्या कुटुंबापासून, घरापासून हे आपले बांधव सीमेवर ६-८ महिने दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कार्याला यामाध्यमातून सलाम करण्यात येणार आहे.
तुषार कुलकर्णी म्हणाले, सैनिकांना राखी पाठविण्याकरीता दुर्गा कॅफेच्या ५० शाखांमध्ये किंवा https://rzp.io/l/8BmU3n7jxy लिंक वर क्लिक करून आपण या आपल्या अनेक शूर भावांना कितीही राख्या पाठवू शकता. दिनांक १५ आॅगस्टपर्यंत या राख्या जमा करायच्या आहेत. याच बरोबर आपण आपला त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा शब्दात सांगून आपला फोन नंबर पण देऊ शकता. ज्यामुळे रक्षण करणारे बांधव त्यांच्या भावना आपल्याबरोबर व्यक्त करू शकतील. उपक्रमात सहभागी होण्याकरीता ९१३०९०९०७० या क्रमांकावर संपर्क साधावा. या वीरांच्या साहसाला आणि शौ-याला प्रतिसाद व धन्यवाद देण्याची ही एक उत्तम संधी आहे. अभियानात सहभागी होऊन त्यांचे मनोधैर्य आपण शतपटीने वाढवू, असेही त्यांनी सांगितले.