पुणे :-आषाढी पालखीनिमित्त `महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या वतीने `वारी नारीशक्ती`ची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यातील विवीध भागात कार्यकरणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधींनी वारीतील महिलांना मार्गदर्शन केले.
दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी महिलांनी सक्षमपणे काम करावे. तसेच प्रत्येक नारी ही शक्तीशाली असतेच तिच्यात कलागुण असतात. तिला हवे असते ते योग्य मार्गदर्शन महिला आयोगाचा वारी नारीशक्ती हा उपक्रम यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे मत यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केले.
लोणंद मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला, अशी माहिती उषा बाजपेयी (महाराष्ट्र राज्य महिला आयोग, `वारी नारीशक्ती` ) यांनी दिली.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. त्यांनी उषा बाजपेयी यांच्याकडे दिंडी उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवराना आमंत्रीत करणे या नियोजनाची जबाबदारी दिली आहे.
बुधवारी झालेल्या या उपक्रमात भारत विकास परिषद, आराधना चॅरिटेबल ट्रस्ट, दीपिका कोलंबस ट्रस्ट, वंचित विकास, माई बालभवन, पाखर संकुल, उद्योगवर्धिनी, नॅशनल कंझुमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एक क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असतो.
महिलांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा उपक्रम आहे. आर्थिक, सामाजिक, आरोग्य दृष्ट्या महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहे. महिला आयोगातील महिलांसाठी विविध योजना, कायदे सरकार राबवित आहेत परंतु त्याची माहिती गावोगावी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम वारीच्या माध्यमातून सक्रिय होत आहे, असे विचार स्वयंसेवी संस्थांनी मांडले.
दिंडीमध्ये महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठीची मशिन्स आहेत. सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत महत्वाचे संदेश देऊन प्रबोधन केले जात आहे. तसेच कीर्तन, पोवाडा आणि भारुडच्या माध्यमातून सक्षमीकरण संदेश दिले जात आहेत.
यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, क्रीडापटू, वास्तूरचनाकार, वकील, स्वयंसेवी संस्था, आर्मी ऑफिसर, मुस्लिम महिलांचे पथक यांचा सहभाग आहे.
या उपक्रमातील चित्ररथ आणि महिला सक्षमीकरण दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा पुणे येथे झाला.
महिला सक्षमीकरण हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मक वारसा आहे. या वारीत लक्षावधीच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. यात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. अध्यात्माचा समाजप्रबोधनासाठी प्रभावी वापर हे वारीचे खरे सूत्रे आहे. या सूत्राला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे कार्य महिला आयोग करत आहे.
वारी नारीशक्तीची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर आधारित महिलाचे कीर्तन, भारूड याचे आयोजन करण्यात येत आहे.