पुणे-राज्य सरकारने प्रत्येक उद्योगासाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य केल्याने, औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे मत डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
डीईएस टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या ‘ॲडव्हान्सड् डिप्लोमा इन इंडस्यिल सेफ्टी’ या अभ्यासक्रमाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात कुलकर्णी मार्गदर्शन करत होते. एरंडवणा अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश जगताप, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, विभाग प्रमुख डॉ. आर. एस. डोंगरे, अभ्यासक्रमाच्या प्रमुख ऋतुजा यमकनमरडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगताप म्हणाले, ‘सुरक्षितता हे सेवाभावी कार्य आहे. सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रापेक्षा नागरी भागातील सुरक्षितता आव्हानात्मक आहे. असुरक्षितता काय आहे, याचा विचार करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या लागतात.’
विजयकुमार कुलकर्णी, राजेंद्र पवार, राहिल मसूरकर, प्रमोद भालेराव, घनश्याम मैथडी, वैभव काळे, महेश पवार या माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. खेमराज रणपिसे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. डोंगरे यांनी प्रास्ताविक, ऋतुजा यमकनमरडी यांनी सूत्रसंचालन केले.