पुणे- दक्षिण पुण्यात विशेषतः सहकारनगर ,पद्मावती,चव्हाणनगर ,धनकवडी ,कात्रज या परिसरात किराणा माल विकणार्या किरकोळ दुकानदार आणि भाजी पाला विकणाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉक डाऊन चा फायदा घेत ग्राहकांना अवाच्या सवा दराने वस्तूंची विक्री करायची पद्धत सर्रास सुरु ठेवली आहे. सुमारे किमान ५० टक्के ते ०० टक्के जादा दराने म्हणजेच चढ्या भावाने हि विक्री करताना ग्राहकांना तुटवडा असल्याचे खोटे सांगून हि लुटमार होते आहे.
कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना, अनेक जण संकटात सापडले असताना, मदतीचे अनेक हात पुढे आलेले दिसतात. त्याचवेळी परिस्थितीची असहायता पाहून हात साफ करणारेही नेहमीप्रमाणे दिसू लागले आहेत . कोणत्याही वस्तूची टंचाई नसताना आज बाजारात अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांवर भाजीपाला, फळे फेकून देण्याची पाळी आली. कारण वाहतूक ठप्प आहे. शहरात भाजीपाला आणला तरी व्यापारी भाव पाडून खरेदी करतात, म्हणजे एक तर भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने हाती पडेल ते घ्यावे लागते.
‘अडला हरी’ यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही. दुसरीकडे सुगी संपत आल्याने गहू, ज्वारीसारख्या धान्याचे साठे भरपूर आहेत. डाळी मुबलक आहेत; पण किरकोळ विक्रीत यांचीही भाववाढ झाली. सरकारही अशा नफेखोरांवर नजर ठेवून आहे; परंतु सरकारसमोर आजच्या घडीला हा प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही. अशी संधी साधत नफेखोर उखळ पांढरे करीत आहेत. मागणी आणि पुरवठा यापैकी कोणत्याही घटकात तफावत नसताना अशी भाववाढ अनैसर्गिक असते आणि ती केवळ नफेखोरांनीच केलेली असते, अशीच परिस्थिती दुधाचीही आहे.
दुधाचे उत्पादन नाशवंत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागते किंवा कवडीमोल दराने तरी विकावे लागते; पण शहरांमध्ये दूध महागले आहे. या साखळीमध्ये सर्वात जास्त नागवला जातो तो शेतकरी. कारण या उत्पादनामध्ये खरी गुंतवणूक त्याची असते. तो जसा पैसा गुंतवतो तसाच तो श्रमही खर्ची घालतो; पण त्याची झोळी फाटकीच राहते. यावर्षी तर पावसाने झोडपल्याने त्याचे खरीप गेले. कोरोनाचा पहिला फटका त्याला बसला. कोरोनामुळे चीनवर संकट आले त्यावेळी कापसाचे भाव गडगडले. हा काळ नेमका कापूस विक्रीला काढण्याचा होता. अतिवृष्टीमुळे मक्याचे उत्पादन घटले आणि आयातही ठप्प झाल्याने मक्याचे भाव कधी नव्हे ते दोन हजारांवर पोहोचले होते; पण कोरोनाने पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडल्याने मक्याची पार घसरगुंडी झाली. ती सहा-सातशे रुपयांपर्यंत म्हणजे येथेही नुकसान झाले.
आताही रबीची सुगी झाली आणि घाऊक बाजारातील भाव नैसर्गिकपणे उतरले. शिवाय कोरोनाच्या प्रकोपाचाही परिणाम झाला. बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक पातळीवरच आतबट्ट्याचे व्यवहार करावे लागले. शेवटी नुकसान शेतकऱ्याचेच झाले आहे. अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवणे तसेच नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा असली तरी ती सध्या वेगळ्या आघाडीवर व्यस्त आहे. संकटात जशा आशादायक बातम्या लढण्याची ऊर्मी वाढवतात, तशा अशा संधिसाधूंच्या कृत्यामुळे एक निराशेचे मळभही येते. तरी लढताना धीर सोडता येत नाही आणि आता तर अदृश्य शत्रूशी अस्तित्वाची लढाई आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर असला तरी प्रामुख्याने युरोप, अमेरिकेत ही प्रवृत्ती दिसत नाही किंवा तशा बातम्याही नाहीत. त्याचवेळी नागरिकही तितक्याच जबाबदारीने वागताना दिसतात. बाजारात अनावश्यक मागणी झाली, तर नफेखोरांसाठी ती संधी असते. देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते. या अकारण काळजीपोटी ही वारेमाप आणि बेभाव खरेदी चालू आहे. कारण कोरोनाच्या भीतीने सारासार विचार करणे समाजाने सोडून दिलेले दिसते.
महाराष्ट्रात तर वर्षभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आहे, तरी जनतेच्या मनात संभ्रम का निर्माण होतो, असा प्रश्न पडतोच. भीतीमुळे सारासार विवेक शिल्लक राहत नाही. अशावेळी उमेद वाढवणाऱ्या गोष्टी असताना मानवी प्रवृत्तीचे दर्शनही प्रकर्षाने होते. शेवटी लोभ, हाव, स्वार्थ याला काहीही म्हणता येते. शेवटी ती मूळप्रवृत्ती आहे आणि आपल्या गूणसूत्रांसह आलेली, म्हणूनच संधिसाधंूसाठी सुकाळ म्हणावा आणि आपला संघर्ष चालू ठेवावा.
देशात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, फळे, इंधन, अशी कोणत्याही वस्तूंची टंचाई नाही. सरकारही वारंवार याचा दिलासा देताना दिसते; पण लोकच अनावश्यक खरेदी करून अशा वस्तूंचे साठे करीत आहेत. कारण बाजार बंद राहील ही भीती वाटते.