एक वेळ भाजपा राष्ट्रवादीचे सरकार होईल पण सेना भाजपचे होणार नाही – विश्वंभर चौधरींचा कयास
पुणे – विधान परिषदेनंतर घडलेल्या राजकीय घटनांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे लक्ष वेधून घेतले असून यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .
ते म्हणाले ,’ चाळीस गुवाहटीत पोचलेत. अजून दहा शिंदेंसोबत आहेत असा दावा आहे. तसं असेल तर सेनेकडे फक्त चार आमदार उरतात. आदित्य ठाकरे सोडून इतर तीन निष्ठावान कोण एवढाच उत्सुकतेचा मुद्दा आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री परागंदा होतात पण ते पोलिसांना कळत नाही हे बुद्धीला पटत नाही. गृहखातं स्वतःकडे न ठेवण्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. हा कट एका दिवसात शिजला नसणार. मात्र सीआयडीला त्याची खबर नसावी हे आश्चर्य आहे. राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं अशी व्यवस्था असते.’तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा’ हा सल्ला उद्धवजींनी नाकारला असता आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर प्रतिष्ठा गेली नसती. हा दिवस पहावा लागला नसता. बाकी जे घडलं त्याचं बरंच श्रेय संजय राऊतांना द्यायला पाहिजे. दररोज सकाळी नऊ वाजता चॅनलवर येऊन भाजपाच्या रोषाच्या संपूर्ण फोकस शिवसेनेवर राहील याची काळजी त्यांनी घेतली. राजकारणात परतीचे दोर कधीच कापायचे नसतात, ते दररोज सकाळी नऊ वाजता सपासप कापून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या किंवा नकळत राष्ट्रवादीला सेफ पॅसेज दिला. संजय राऊतांचा उद्देश तो नक्कीच नसणार पण घडलं मात्र तेच. तिकडे स्वतःचे दोन मंत्री आत टाकले तरी राष्ट्रवादीनं संयत प्रतिक्रिया देत दोर पूर्णतः कधीच कापले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की एकवेळ भाजप-राष्ट्रवादी सरकार होईल पण भाजप-सेना सरकार बनणार नाही. उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. कदाचित हा त्यांचा प्रांतच नव्हता किंवा आसपास सगळेच दगाबाज होते.असे विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.
फार मोठ्या कोंडीत सापडले आहेत. पक्ष, पक्षप्रमुखपद आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवायचं असेल तर शिंदेंसोबत तडजोड करण्याला पर्याय दिसत नाही.राजकारणात असे पेच येतात ते काही तरी गमावून सोडवावे लागतात. शिवसेनाप्रमुखपद की मुख्यमंत्रीपद याचा निर्णय उद्धवजींना घ्यायचा आहे. ही अभूतपूर्व आणि तितकीच दुर्दैवी कोंडी आहे पण दुसरा पर्याय दिसत नाही.असेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.