पुणे : रिक्षा कंपनी स्थापन करून याच कंपनीमार्फत छोट्या वस्तू वाहतुकीस परवानगी मिळावी, अशा मागणीचे पत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठविले आहे.
सध्याच्या साथीच्या काळात रिक्षाद्वारे प्रवासी सेवेमार्फत मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. रिक्षा भाड्याने घेऊन प्रवासी सेवा देणारा रिक्षा चालक साथीच्या पूर्वी रिक्षा मालकास रोज शिफ्टचे २०० रुपये द्यायचा ती रक्कम १०० रुपयांवर आली आहे. रिक्षा व्यवसायावर आलेले हे संकट संधी मानून रिक्षा सेवेत अमुलाग्र बदल करता येईल. याबाबत रिक्षा कंपनी सुरू करण्याच्या रिक्षा पंचायतीच्या प्रस्तावाला परवानगी द्यावी असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.
रिक्षांना छोट्या वस्तू (वजन, आकाराच्या मर्यादा ठरवून) याच कंपनीमार्फत वाहतुकीला परवानगी द्यावी. त्यामुळे रिक्षा चालकांना जोड व्यवसाय मिळेल आणि वस्तू घरपोच मिळाल्यातर लोकांचे बाहेर जाणेही थांबेल.
खुल्या परवान्यांमुळे रिक्षांची संख्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दुप्पट म्हणजे सुमारे एक लाख झालेली आहे. रिक्षा तळांची संख्या मात्र पूर्वीइतकीच म्हणजे एक हजारच आहे. ती संख्या वाढवून मिळावी अशीही मागणी शिरोळे यांनी केली आहे. तसेच रिक्षा, टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे त्याद्वारे उत्पन्न वाढ, अन्यायकारी विमा हप्त्यातून सुटका, वैद्यकीय सहाय्य आदी योजना आमलात आणाव्या असेही शिरोळे यांनी पत्रात सुचविले आहे.