पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू होत असतानाच मार्गावरील २३ किलोमीटरच्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जावी, अशा मागणीचे पत्र पालकमंत्री अजित पवार यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले आहे.
पुण्यातून बाहेर पडणारी आणि बाहेरुन पुण्यात येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या मार्गाच्या कामामुळे वाहतुकीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी वाहने, अवजड वाहने, पीएमपीच्या बसगाड्या, दुचाकी वाहने याचे २३ किलोमीटर मेट्रो मार्गावरील वाहतुकीचा नियोजन आराखडा करणे गरजेचे आहे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.
या वाहतूक नियोजनाचा आराखडा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आदी संबंधित प्रशासकीय अधिकारी, टाटा सिमेन्सचे प्रशासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलवावी. या बैठकीत मी स्वतःही सहभागी होईन आणि सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना सुचवेन, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.