एमआयटी डब्ल्यूपीयूत आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा
पुणे, दिः २१ सप्टेंबर: “अपेक्षा ठेवल्याने क्रोध निर्माण होतो. यातूनच व्यक्तिचे चित्त विचलित होते. ही स्थिती अशीच राहिल्यास त्याच्या पदरी केवळ दुखः व निराशाच येते. त्यामुळेच सर्वांना अध्यात्माच्या वाटेवर चालून सुखाचा मार्ग शोधावा.”असे विचार हार्टफुल्लनेसच्या वरिष्ठ मार्गदर्शिका चेतना राणीवाला यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोथरुड कॅम्पसमध्ये साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
या प्रसंगी हार्टफुल्लनेसच्या पुजा सिन्हा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रभारी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, स्कूल ऑफ फॉमर्सचे अधिष्ठाता डॉ.बी.एस.कुचेकर आणि पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. मिलिंद पात्रे हे उपस्थित होते.
चेतना राणीवाला म्हणाल्या,“ चित्तवृद्धी निरोगी राहण्यासाठी अध्यात्म व ध्यानधारणा अत्यंत महत्वाची आहे. तसेच अहिंसा या तत्वाचे पालन करावे. रोजच्या जीवनात आपल्या चेहर्यावर सदैव हास्य ठेवावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“ सृष्टीवरील वाढती अशांतता लक्षात घेता युनोने हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केेली आहे. आज जगात प्रत्येक व्यक्ती अशांत असतांना एमआयटी डब्ल्यूपीयूने पीस स्टडीजचा पाठ्यक्रम सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये शांतीचे बीज पेरण्याचे कार्य करीत आहे. पुढे जावून हेच विद्यार्थी शांती दूत बनतील.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ शांती आणि प्रेम, चारित्र्य निर्माण व आध्यात्मिक विकास हा धागा पकडून एमआयटी डब्ल्यूपीयू जगात शांतता निर्मितीचे कार्य करीत आहे. जगात शांती नांदण्यासाठी वर्ल्ड पीस डोमची निर्मिती करून विश्वात शांतीचा संदेश देण्याचे कार्य केले जात आहे. मन आणि हदयात परिवर्तन घडवून समाजात शांतता निर्माण करता येईल.”
यावेळी साहील मलगे, मोनिशा कोहली, आर्या मांडवगणे, आर्या राजवाडे आणि प्रणय कारकाले या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विश्वशांतीची गरज का आहे यावर विचार मांडले.
आंतरराष्ट्रीय शांतता दिवसानिमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूत १५ ते २१ सप्टेंबरपर्यंत या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये जवळपास ३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून ध्यानधारणा, योग आणि विश्वशांतीसाठी काय करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच हार्टफुल्लनेस यांच्या सहयोगाने १ हजार वृक्षारोपण करण्यात आले.
प्रा.डॉ.मिलिंद पात्रे यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत बिराडी यांनी आभार मानले.