डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘पुनरावलोकन कोरोना काळाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : देशात करोना संसर्गाला सुरुवात झाली त्यावेळी परिस्थिती भयंकर होती परंतु करोनाचा उद्रेक झाल्यानंतर ज्या पातळीवरून आपण त्यातून बाहेर पडलो ती अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढली आहे. परंतु देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही, अशी खंत पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केली
डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘पुनरावलोकन कोरोना काळाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गंगाखेडकर यांच्या हस्ते नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे झाले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, डाॅ.अविनाश भोंडवे उपस्थित होते. दिलीपराज प्रकाशनने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
डॉ.रमण गंगाखेडकर म्हणाले, कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिकेशन मॉडेल्स नव्हते त्यामुळे लोकांशी संवाद साधण्यास अडचणीचे जात होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही चुका झाल्या त्यामुळे आपले नुकसान झाले, असेही त्यांनी या वेळेला सांगितले.
डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय लोक विसरले. कोरोना अखेरच्या घटका मोजत आहे, परंतु तो संपला नाही. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरविली गेली. भारत देश फारसा शास्त्रोक्त नाही. त्यामुळे शास्त्रावर आधारित गोष्टींवर पटकन विश्वास न ठेवता पारंपारिक समजुतीवर लोक जास्त विश्वास ठेवतात. आरोग्याविषयक जनजागृतीचा बहुसंख्य लोकांवर परिणाम होत नाही परंतु, काही टक्के लोकांवर नक्की परिणाम होतो यासाठी आरोग्य विषयी जनजागृती करत राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.