पिंपरी-देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे असे डॉ. रवी गोडसे (अमेरिका)यांनी सांगितले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” जागतिक आरोग्य व्यवस्था आणि भारत” या परिसंवादात ते बोलत होते.
आय. सी. एम. आर.चे माजी संचालक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. श्रीकांत चिंचालकर(कॅनडा), डॉ. रवी गोडसे(अमेरिका), डॉ. मकरंद जावडेकर(अमेरिका) हे यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. शंतनु अभ्यंकर(वाई -सातारा)यांनी सूत्रसंचालन केले.
आपला देश हा महाशक्ती झाला पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आवश्यक धोरणे राबविण्यात येत असून त्याबरोबर लोक शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. आपल्या देशात आणखी संशोधन होण्यास वाव आहे. मात्र त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. त्याकरता मानसिकता तयार केली पाहिजे, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.
डॉ. गंगाखेडकर म्हणाले, कोरोना भारतात आल्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आपणाला यश आले आहे. त्याचप्रमाणे त्यावर संशोधन करुन लस तयार करण्यात यशस्वी झालो आहोत. पण अजूनही बरेच काम करण्याची गरज आहे.
डॉ. जावडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या औषध उत्पादनात आपल्या देशाने चांगले काम करुन दाखविले आहे आणि त्यावर अधिक संशोधन करण्यात येत आहे. मोठा पुरवठादार देश म्हणून जग आपल्याकडे आकर्षित होत आहे. असे ते म्हणाले.
डॉ. चिंचालकर यांनी मनोगत व्यक्त केले.
पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सर्व मान्यवरांचा शॉल, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन गौरव केला. कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.