पुणे:“ग्लोबल वार्मिंगच्या काळात ‘प्रकृती रक्षकाह दक्षता’ यानुसार पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला त्याचे संतुलन बिघडविणारे घटक नियंत्रित करावे लागतील. हवा, पर्यावरण इत्यादींवर परिणाम करणारे घटक कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ही समस्या भयानक आणि जागतिक असल्याने त्याच्या निराकरणासाठी संपूर्ण जगाला एकत्र यावे लागेल. प्रत्येकाच्या एकत्रित प्रयत्नांनीच या समस्येवर मात करता येईल.” असे विचार माजी केंद्रीय मंत्री व खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या तिसर्या सत्रात‘ पर्यावरण सुरक्षाः खूप मोठ्या प्रमाणात चर्चा व कमी प्रमाणात कृती’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे हेाते.
यावेळी खासदार ज्योत्सना सितलिंग, मेघालयाचे आमदार रक्कमी संगमा, यूपीच्या आमदार अनिता कमल आणि न्याय.आदर्श कुमार गोयल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे समन्वयक रविंद्रनाथ पाटील आणि एमआईटी डब्ल्यूपीयूच्या इंजीनिअरींग विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे.
जयराम रमेश म्हणाले,“ विज्ञानाच्या बेलगाम प्रगती व नवीन शोधाच्या स्पर्धेमुळे माणसाने निसर्गावर विजय मिळवण्याची इच्छा जागृत केली. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. दुसरीकडे, वाढती लोकसंख्या, जंगलतोड, नवीन शहरे, नैसर्गिक संसाधानांचे जास्त शोषण आणि प्रदूषण इत्यादींमुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. काही वर्षापूर्वी प्राणी, हवा, पाणी आणि निसर्ग वाचविण्यासाठी काही कडक कायद्यांची निर्मिती झाली होती. यासाठी काही संस्थाही कार्यरत असून त्यावर अंमलबजावणी करतांना दिसत आहेत. त्याच प्रमाणे सेंट्रल व स्टेट पोल्यूशन्स बोर्ड कार्यरत आहे. तरी सुद्धा राजकारणी मंडळीनी जनतेला आव्हान करून पर्यावरण सुरक्षेसंदर्भातील कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. ही समस्या सामाजिक चर्चेतून संपुष्टात येईल असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ”
“ देशात शाश्वत सामाजिक आरोग्य निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारी भावी पिढी ही सर्व दृष्टीने परिपूर्ण असेल. पर्यावरण व सामाजिक आरोग्य यांचे जवळचे नाते असल्याने युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी विशेष कार्य करावे.”
आदर्श कुमार गोयल म्हणाले,“ पर्यावरण या शब्दाला आता कृतीत उतरविणे गरजेचे आहे. पाणी आणि वायू यांच्या गुणवत्तेत सुधारण होणे गरजेचे आहे. देशाच्या शाश्वत विकासाचे सर्वात मोठे स्त्रोत पर्यावरण आहे. सर्वे भवंतू सुखीनः यात प्रकृतीचा समावेश आहे. देशातील कचर्याच्या डोंगरांची व ई कचर्याची विल्हेवाट लावावी.”
ज्योत्सना सितलिंग म्हणाल्या,“ युवा हे परिवर्तनकारी आहेत त्यामुळे पर्यावरण संरक्षण सारख्या विषयांत त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात पर्यावरण रक्षणासाठी कार्य होतांना दिसते ही सकारात्मक गोष्ट आहे. बद्रिनाथ येथे खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची समस्या होती पण त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करून नियंत्रण मिळविले जात आहे. समर्पण भावनेने कार्य केल्यास पर्यावरणाचे रक्षण करता येईल.”रक्कमी संगमा म्हणाले,“ पर्यावरण सुरक्षेची जबाबदारी सर्वांची आहे. त्यात बिघाड झाला तर त्सुनामी, भूकंप आणि वातावरण बदलासारख्या अनेक गोष्टी दिसून येतात परिणाम स्वरूप त्याचा त्रास मानवजातीला होतो. त्यामुळेच याचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.”
अनिता कमल यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
विद्यार्थी प्रतिनिधी नंदिनी परिहार, आलोकमणी शर्मा, जान्हवी शर्मा, शेरेन अणा थॉमस आणि व्यंकटेश राजपूत यांनी आपल्या भाषणातून पर्यावरण संरक्षण संदर्भात पाऊले उचलविणे गरजचे असल्याचे सांगितले.
प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रो. चयनिका बसू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभलक्ष्मी जोशी यांनी आभार मानले