काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांचा पुढाकार
पुणे-कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरची बिकट आर्थिक परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडाव्या लागणाऱ्या सर्व वयोगटातील नोकरी – कामधंदा करणाऱ्यांना आता शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुल येथे आता रात्र प्रशाला काल सुरु झाली असून. काल १४५ फॉर्म भरून शाळेकडे जमा झाले आहेत त्यापैकी १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शाळेची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग शाळेत सोमवार दिनांक २० जून २०२२ पासून सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल, शिक्षण अधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण पुणे मनपा श्री पोपटराव काळे,उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे, आरटीई पर्यवेक्षक राजेंद्र गाढवे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनशाम सावंत उपस्थित होते.
बालवयातच घरच्या आर्थिक बिकट परिस्थितीने अर्धवट शिक्षण सोडलेल्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी रात्र प्रशाला सुरु करून त्यांना शिक्षणाची स्वप्नपूर्ती सहजसाध्य व्हावी आणि समाजामध्ये आदराची वागणूक मिळावी या उद्देशाने ही रात्र प्रशाला सुरु करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी सांगितले. आबा बागुल म्हणाले की, विविध कारणांमुळे अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते तर काहींना ते घेताही आलेले नाही हे वास्तव आहे. घरच्या जबाबदाऱ्या, पोटाची खळगी भरताना कित्येकांना शिक्षण अर्धवट राहिल्याची सल मनामध्ये कायम असते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये रात्र प्रशालाही सुरु करण्यात आली आहे. जेणेकरून परिस्थितीशी दोन हात करताना त्यांनाही अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचा आनंद मिळाला पाहिजे. शिक्षण नाही ही भावना हद्दपार झाली पाहिजे आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचे समाधान लाभावे या हेतूने सुरु झालेल्या या रात्र प्रशालेत शालेय जीवनाचा अनुभव देणाऱ्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही आबा बागुल यांनी केले आहे.
सदर रात्र प्रशाला इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. आपले ५ वी पर्यंत शिक्षण झाले असल्यास आपल्याला ८ वी पासून शिक्षणाची संधी मिळणार असून त्यापुढील शिक्षण झाले असल्यास आपल्याला ९ वी व १०वी मध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणासाठी वय नसते आपल्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्र प्रशालेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा असेही आबा बागुल शेवटी म्हणाले.