पुणे-: मेट्रो एका दिवसात किंवा महिन्यात उभी राहिली नाही. २००७ साली पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला महापौर बसला तेव्हा राज्यात आघाडी तर केंद्रित युपीए सरकार होत. आणि त्यावेळी सर्व नेत्यांच्या विचार विमार्ष झाल्यावर राज्याच्या कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हा शरद पवार यांनी आणि सर्व सहकार्यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये २००७ ते २०१४ या काळात ठराव केले. दुर्दैवाने २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने मेट्रोच्या मंजुरीचा शेवटच्या सही साठी विषय राहिला होता. आणि २०१६ मध्ये राष्ट्रवादीचे महापौर असतानाच या पुणे मेट्रोचे भुमी पूजन झाले होते. त्यामुळे मेट्रोच्या सर्व मान्यता या राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना झालेल्या आहेत त्यामुळे याच सर्वाथा यश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहरातील पदाधिकारी अंकुश काकडे ,प्रशांत जगताप, दिपाली धुमाळ ,नितीन कदम,वनराज आंदेकर, बाळासाहेब बोडके यांनी ‘मंडई विद्यापीठ कट्ट्यावर बोलताना केला आहे.
आज मंडई विद्यापीठ, पुणे कट्टावर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक वनराज आंदेकर, नितीन कदम, बाळासाहेब बोडके, नीलेश निकम, महेश हांडे, गणेश नलावडे आदी पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. शहराच्या विविध प्रश्नावर, राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात या मुद्यावर विषेश लक्ष केंद्रित करून आज कट्ट्यावर चर्चा झाली. मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान व सत्कार देखील करण्यात आला.
अंकुश काकडे म्हणाले, संपूर्ण भारतात कुणालाही वाटले नव्हते कि शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येईल. तथा हिंदूत्वावर झालेली भाजपा सोबतची युती कधीतरी तुटेल अस दोन्ही पक्षातील लोकांना वाटल नव्हत. परंतु मुख्यमंत्री पदाच्या वादावर ती युती तुटली. परंतु हे तोडण्यात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा काही हात नव्हता. शरद पवार हे तोडण्याच नाही तर जोडण्याच काम नेहमी करतात. आणि हे पण खर आहे की, जर पवारांनी पुढाकार घेतला नसता तर राज्य माहाविकास आघाडी जन्मालाच आली नसती.
शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी ताकदीने उभी आहे. पण राज्यात आम्ही माहाविकास आघाडी म्हणून सत्तेत आहोत आणि त्यामुळे सर्वप्रथम आमचा प्रयत्न सत्ताधारी व भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून पायउतार करणे आणि उद्याचे सक्षम प्रशासन देण्याकरिता शंभर टक्के राष्ट्रवादीचा महापौर तिथे बसेल, याच्यासाठी आमचे समविचारी पक्ष आमच्या बरोबरीने असतील आणि या सर्व गोष्टींचा सर्वथा निर्णय पक्षाचे श्रेष्ठीजन घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला सर्वतोपरी असेल. असे मत प्रशांत जगताप यांनी कट्ट्यावर व्यक्त केले.
बाळासाहेब मालुसरे म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात, आजतागायत कट्टावर २५०० हून अधिक मान्यवर येऊन गेले. विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे समविचार समाजासाठी कसे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते. त्याच क्रमांत राजकारणाच्या दृष्टीने पुणे शहर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कशी भुमिका घेऊन काम करेल यावर आज चर्चा झाली. येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्ट्यावर आमंत्रित करणार आहोत असेही ते म्हणाले.