पुणे,दि.१६:“शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. बुद्धांचे विचारच शांततामय जीवनाची ताकद आहे. वर्तमान काळात वाढत जाणार्या हत्या आणि आत्महत्या यांतील मधला मार्ग शांतीचा आहे. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते.” असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. प्रसाद खांडेकर, कवि डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,“बौध्द धर्माच्या उदात आठ पट मार्गाचे प्रतिनिधित्व करतात. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणा सारखी शिकवण दिली. बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भगवान गौतम बुद्धांचे पंचशिल तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे. तसेच, विश्व कल्याणाचा खरा ग्रंथ भगवद्गीता आहे. कसे जगावे आणि कसे जगू नये, जीवनाचा उद्देश काय, आपले कर्तव्य काय आहे हे त्यात नमूद आहे. जीवन सुखमय होण्याचे सूत्र म्हणजे त्याग आणि समर्पण आहे. संपूर्ण जगात भारताची ओळख भगवान बुद्ध् आणि महात्मा गांधी यांच्या नावाने आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ बुद्धांचे विचार हे जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर नागरिकांसाठी शेकडो घरांची निर्मिती केली. शांतता नांदावी यासाठी जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती डोमची निर्मिती करून अविरतपणे शांती स्थापनेचे कार्य ते करीत आहेत. आजच्या काळात सायन्स इन सायलेन्स ही संकल्पना खूप गरजेची आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ गौतम बुद्धांबरोबरच महापुरूषांचे विचार भारताबाहेर पोहचविण्यासाठी सर्वांना समोर यावे लागेल. नकारात्मतेची भावना काढून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. ”
त्यानंतर प्रा. विक्रांत गायकवाड, मिनाक्षी आर्या, डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक मांडले