अनधिकृत बांधकामे ही वाहतूक कोंडीला कारणीभूत
पुणे- काही वर्षांपूर्वी अगदी तत्कालीन सत्ताधीश ढोले पाटलांच्या ,रामकृष्ण मोरेंच्या आणि कलमाडींच्या हॉटेलांचा समावेश असूनही अशा बेकायदा बांधकामे केलेल्या हॉटेल्स चे सर्वेक्षण करून तत्कालीन नगर अभियंता शिवाजीराव पवार यांनी महापालिकेच्या सभागृहात अशा हॉटेल्सची नावे आणि मालकांची नावे देखील समोरच जाहीरपणे सांगितली होती . पण आता गेल्या ५ वर्षात महापालिकेच्या हद्दीतील अशा हॉटेल्सचे सर्वेक्षणच झाले नसल्याचे उघड झाले आहे. पूर्वीच्या काळात साईड मार्जिन आणि माळे अशा स्वरूपात हॉटेल्सनी बेकायदा बांधकामे केली होती तर आता रुफ टॅाप हॅाटेल म्हणून देखील नवा प्रकार रुजला आहे. बांधकाम निरीक्षक हा अशा सर्वेक्षणात महत्वाची भूमिका बजावतात ज्याना जे इ म्हटले जाते . यांना आपल्या हद्दीतील बहुतेक सर्वच अनधिकृत बांधकामांची माहिती असते . आणि ते कुणाची आहेत हे देखील ठाऊक असते . पण ते अशा बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे कायमच दिसून आले आहे. कधी राजकीय दबाव , कधी प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने दबाव तर कधी स्वहित साधण्याच्या हेतूने देखील अशा बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वेळो वेळी स्पष्ट झाले आहे . हॉटेल्स , लॉजेस , होस्टेल्स , व्यावसायिक इमारती , दुकाने अशा ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जीवितहानी होऊ शकते पण याकडे देखील आजवर दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले आहे .काही वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई साठी महापालिकेला स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कुमक कायमस्वरूपी दिलेली आहे तरीही स्थानिक पोलीस बंदोबस्त मिळत नाही असे कारण देऊन अशा बांधकामांवर कारवाई टाळली जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या ६ वर्षात कोण त्याही महापालिका आयुक्तांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबधितांना दिलेले नाहीत . निव्वळ फेरीवाले, स्टोल धारक यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते आणि लक्ष्मी रस्त्यासह बड्या बड्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर दुकानासमोर टाकलेल्या जाळ्या, रस्त्यावर पुढे सरकत आणलेले दुकाने याकडे देखील सर्रास दुर्लक्ष केले जाते आहे. जेई हा कर्मचारीच या सर्वांच्या केंद्रस्थानी असून त्यास बड्या अधिकाऱ्यांनी पाठबळ दिलेले असल्याने शहरातील अशा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढली असून ती जीवितहानी हि करू शकेल अशा स्वरूपाची असल्याचे नाकारता येणार नाही. परवानगी पेक्षा दुपटी तिपटीने जास्त बांधकामे बांधल्याची प्रकरणे देखील मोठ्या संख्येने आहेत . त्यातच रुफ टोप हि पद्धत रूढ होत चालली आहे . निव्वळ कधी तरी आग लागून धोका होईल एवढीच शक्यता यश प्रकरणात गृहीत धरता येत नाही तर अशी बांधकामे वाहतुकीच्या कोंडीला देखील जबाबदार असल्याचे स्पष्ट आहे .पण केवळ करोडोच्या मागे धावणाऱ्या व्यवस्थेला याकडे पाहाण्याची इच्छ्याच नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. राजीव अगरवाल , अरुण भाटीया या दोन आयुक्तांच्या कारकिर्दीत बडी बडी अनधिकृत बांधकामे उखडून टाकण्यात आली . अशी कारवाई अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने केलेले नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.