पुणे – पुण्यात स्मार्ट सिटी योजना फसलेली आहे. मुळा-मुठा नदी संवर्धन योजना, जायका प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना असे मोठे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत लांबणीवर पडलेले आहेत. खासदार बापट यांनी आता त्यासाठी आंदोलन करण्याचे सोडून ते हिंजवडी मेट्रो लवकर सुरु करावीम्हणून आंदोलन करत आहेत या साठी खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे. बापट यांची ही आदळआपट कशासाठी? अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी केली आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाची प्राथमिक तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. ९८ टक्के भूसंपादनही झालेले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम कधीही सुरु होऊ शकते. हे माहीत असूनही काम सुरु करावे अशा मागणीसाठी खासदार बापट यांनी आंदोलन सुरु केले. आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खूष करण्यासाठी हा दिखाऊपणा आहे याची जाणीव भाजप नेत्यांसह पुणेकरांनाही आहे. पुण्यातील मेट्रो मार्गासाठी राज्य सरकारने कायमच पाठबळ दिले आहे. आंदोलन करुन राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल दिशाभूल करण्याचा बापटांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेतृत्व खासदार बापटांकडे आहे . आता त्यामुळे पूर्वीचे राजकारणातील एकमेकांचे सहकारी विरोधक अशी ओळख असलेले हे दोन्ही नेते एकमेकांच्या पक्षांना आणि कारभारांना लक्ष्य करतील यात शंका नाही . शिवसेना , राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा सर्वांच्याच टीकेला भाजपच्या नेतृत्वाना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात या राजकीय रंगत वाढण्याची शक्यता आहे.