पुणे-पुण्याचे वैभव ,सांस्कृतिक नगरीची सर्वाधिक महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू अशा शब्दांनी आणि अनेकांच्या कर्तुत्वातील घडणीच्या ,संघर्षाच्या किस्स्यांनी कलाक्षेत्राचे हृदय बनलेली बालगंधर्व रंगमंदीराची वास्तू पाडून तिथे नविन वास्तू उभारण्याचे मनसुबे आता पुन्हा बाहेर पडून स्पष्ट अधोरेखित झाले आहेत .विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींची महापालिकेवर सत्ता नसताना प्रशासकीय कारकिर्दीत याबाबत राज्यातील सत्ताधीशांशी संपर्क साधून रंगमंदिराचा ‘पुनार्विकास ‘ साधण्याच्या हालचालींना वेग कसा आला ? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्यता असताना ,बालगंधर्व च्या वास्तू बद्दल मात्र कला क्षेत्रातील अनेकांची हृदये हेलावून जात आहेत .दुमजली पूल ,मेट्रो आणूनही वाहतूक कोंडी तर सुटली नाहीच पण हे बालगंधर्व पाडून त्याचे ‘नटराज थियेटर ‘तर होणार नाही ना ? असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतो आहे. रंगमंदिराच्या ३/ ३ ऑडीटोरीयम ची स्वप्ने दाखविणारी मंडळी या शिवाय इथे आणखी कोणकोणत्या व्यावसायिक बाबींच्या उभारण्या करणार आहे हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याने ,नक्की यांना पुनर्विकासात रस आहे कि ..आणखी कशात ? अशा प्रश्नांनी देखील अनेकांच्या मनात काहूर केले आहे. तर काहींनी, ‘आहे ती वास्तू जपा … आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यिकरण करून जुनं सोनं नाहीसे नका करू , अशी भावनिक साद देखील घातली आहे .ऐतिहासिक कोतवाल चावडी पाडली तेव्हा लोक ढसाढसा रडले तशी काहीसी अवस्था इथे होईल किंवा होऊ शकते याचाही अंदाज आता घ्यायला हवा . ज्यांनी मुळशी पैटर्न पाहिला त्यांनी तरी बालगंधर्वच्या बाबतीत सावध भूमिका घेणे गरजेचे आहे असे रसिकांनाही वाटते आहे.
हे नाट्यगृह केवळ पुणेकरांचेच नव्हे, तर जगभरातील सर्व मराठी जनांचे लाडके नाट्यगृह आहे. मराठी माणसांनी ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, त्या बालगंधर्व आणि पु. ल. देशपांडे यांच्या नावांशी निगडित हे नाट्यगृह आहे, हे त्यातले प्रमुख कारण. पुलंच्या पुढाकाराने १९६२ मध्ये खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते या नाट्यगृहाची पायाभरणी झाली. हे नाट्यगृह पूर्ण झाले १९६८ मध्ये. तेव्हा मात्र बालगंधर्वांचे निधन झाले होते. रसिकाग्रणी कॉंग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या रंगमंदिराचे उद्घाटन झाले, तेव्हाच्या काळाच्या मानाने अतिशय आधुनिक, भव्य, वातानुकूलित आणि सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे हे नाट्यगृह अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरले. या नाट्यगृहाच्या बाहेर जवळपास रोजी संध्याकाळी झळकणारा ‘हाउसफुल’चा बोर्ड आणि दरवळणारा मोगऱ्याच्या गजऱ्यांचा सुगंध ही पुणेकर रसिकांच्या नाट्यप्रेमाची जणू पावतीच!
. ‘बालगंधर्व’ हा पुणेकरांच्या एवढ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, की त्यावर तातडीने नकारात्मक प्रतिक्रिया येणे साहजिक आहे . राजकारणी मंडळींवरचा सामान्यांचा उडालेला विश्वास हेही एक प्रमुख कारण आहेच. मोक्याच्या जागांवर डोळा ठेवून असलेले राजकारणी आणि त्यातून शहराचे मानबिंदू असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांचा होत असलेला ऱ्हास याला आपण सर्व जण साक्षी आहोत. पुनर्विकास म्हटले, की त्यात निविदा आणि मलिदा हे विषय येतातच. त्यामुळे ‘पुलंच्या कल्पनेतून बांधलेले एवढे देखणे रंगमंदिर पाडायचे ?’ अशी एक स्वाभाविक आणि भावनिक प्रतिक्रिया उमटते आहे मात्र, शांतपणे, गांभीर्याने विचार केल्यास आणि पुढील ५० ते शंभर वर्षांचा काळ डोळ्यांसमोर ठेवल्यास . सध्याचे रंगमंदिर न पाडता, या वास्तूचे नूतनीकरण करणे आणि आजूबाजूचा सर्वच परिसर विकसित करणे हाही एक पर्याय मांडला जातोय . नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण करून, तेथे आकर्षक कॅफेटेरिया तयार करता येईल आणि डोळ्याचे पारणे फिटेल असा नैसर्गिक संवर्धन राखूनच असा विकास होईल , पण जर अन्य व्यवसायिक म्हणजे जसे डेक्कन सिनेमाच्या जागेवर झालेला व्यावसायिक वापर पाहता त्या सिनेमागृहाला दुय्यम दर्जा प्राप्त होतो तसे होऊ नये . या निसर्गाच्या सानिध्यातील कलाकारांसाठी वरदान ठरणारी निव्वळ रंगमंदिराची वास्तू आणि तेवढीच वास्तू असावी .नाही तर मोक्याच्या जागेवर डोळा होता असाच आरोप होईल असे कोणतेही अन्य बांधकाम इथे होऊ नये असेही अनेकांचे मत आहे