महावितरणचे आर्थिक; नुकसान वीजग्राहकांची गैरसोय
पिंपरी : गेल्या सहा महिन्यांमध्ये महावितरणच्या पिंपरी व भोसरी विभागामध्ये महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच इतर कंपन्यांच्या विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्रांद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल 131 ठिकाणी उच्च व लघुदाबाच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. यात महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात खोदकामांना वेग येतो. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाने या महिन्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र विविध कामांसाठी खोदकामास परवानगी दिलेली होती. त्यामुळे या कालावधी देखील प्रामुख्याने वाकड, पिंपळे गुरव, निगडी, थेरगाव आदी भागांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार घडले. त्यातच मनुष्यबळ कोरोनामुळे अत्यंत मर्यादित असल्याने या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. भूमिगत वाहिन्या तोडल्यानंतर खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा भूमिगत वाहिनी तोडली जात असल्याचेही प्रकार दिसून आले आहेत.
खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधीत विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता थेट खोदकामास सुरवात करीत असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे. खोदकामाची रितसर परवानगी घेतल्यानंतर महावितरणच्या संबंधीत कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांचा खोदकामातून धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. खोदकामाच्या ठिकाणी कर्मचारी भूमिगत वीजवाहिन्यांची माहिती देऊ शकतो. पण महावितरणला याबाबत कोणतीही पूर्वमाहिती किंवा सूचना मिळत नसल्याची स्थिती आहे.
पिंपरी व भोसरी विभागात गेल्या सहा महिन्यांमध्ये स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन व इतर विविध कामांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर कंपन्यांच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वाहिन्या तोडल्याच्या किंवा वाहिनीची हानी करण्याचे प्रकार समोर आले आहे. भूमिगत वीजवाहिनी तोडल्यानंतर सर्वप्रथम महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो व वीजवाहिनीची दुरुस्ती केली जाते. काही वेळेस खोदकामामध्ये लोखंडी टोकदार अवजारांमुळे वीजवाहिनीला केवळ चिरा पडून हानी होते. त्यावेळी वीज खंडित होत नाही. मात्र पावसाळ्यात जमिनीत पाणी झिरपल्यानंतर वाहिनीच्या चिरेत पाणी गेल्यामुळे आर्द्रता निर्माण व वीजपुरवठा खंडित होतो. वीज खंडित होण्याची कारणे शोधताना भूमिगत वाहिन्यांमधील बिघाड लवकर दिसून येत नाही. त्यासाठी विशेष केबल टेस्टींग व्हॅनद्वारे तपासणी करावी लागते. त्यानंतर दुरुस्तीसाठी वीजवाहिनीला एक-दोन किंवा त्यापेक्षा अधिक जॉईंट देण्याचे काम करावे लागत आहे.
पिंपरी विभागामध्ये पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय, बसस्टॅंड, चंद्ररंग सोसायटी, लक्ष्मीनगर, देवकर पार्क, तुळजाभवानी मंदिर चौक, जगताप पेट्रोल पंप, डायनासोर गार्डन चौक, सूर्यनगरी, साई हेरिटेज, गुलमोहर कॉलनी आदी परिसरात गेल्या पाच महिन्यांमध्ये 53 वेळा भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तुटल्या आहेत. यासोबतच वाकड परिसरातील काळाखडक चौक, रत्नदीप कॉलनी, कस्पटेवस्ती, वाकड गावठाण, प्लॅटीनम सोसायटी, म्हातोबा चौक, अक्षय टॉवर, वाकड सेंटर आदी भागात 21 वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच थेरगाव परिसरातील कुणाल रेसिडेंसी, रोजवूड हॉटेल, रॉयल कोर्ट सोसायटी, बाणेर कॉर्नर आदी ठिकाणी 17 वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत.
भोसरी विभाग अंतर्गत निगडी परिसरामध्ये तब्बल 19 वेळा हा प्रकार घडला. यामध्ये भक्ती शक्ती चौक, अंकुश चौक, स्वप्नपूर्ती सोसायटी, निगडी पवळे चौक, निसर्ग दर्शन, एसपीएम शाळा यमुनानगर, सेक्टर 26 ते 28 या भागात विविध प्रकारच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे दिसून आले होते. याशिवाय देहूरोडमधील वाल्हेकरवाडी परिसर, तळवडे चौक, आकुर्डीमधील संभाजीनगर तसेच भोसरी गावामध्ये सुद्धा महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.