पुणे- २४ तास पाणी पुरवठा केला तर लोक पाण्याचा साठा करणार नाहीत ,नळावर झुंबड उडणार नाही , कधीही जा ,पाणी मिळेल अशा व्यवस्थेत चिंता कोणाला उरणार नाही म्हणून २४ तास पाणीपुरवठा योजना पुण्यात राबवू पाहणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून परवा केलेल्या लॉकडाऊन च्या घोषणेने अखेर नळावर किंवा पाण्याच्या टँकरवर जसा गोंधळ माजतो त्याहून अधिक गोंधळ माजविला आणि कोरोनाला हात पाय पसरविण्यास डोंगराएवढे बळ दिल्याचे आज पुण्यात सर्वत्र दिसलेल्या गर्दीने स्पष्ट दिसून आले आहे .लॉक डाऊन हा कोरोनावर उपाय होऊ शकत नाही ,तुम्हाला खायलाच मिळाले नाही ,बांधून ठेवले तर तुम्ही शत्रूशी लढणार कसे ? यावर हा शत्रू म्हणे वेगळा आहे . घरात बसून राहा आणि त्याला पराजित करा अशी हाकोटी पिटत लोकांचे काम धंदे बंद करत , नौकरी व्यवसाय बुडवून टाकीत लॉक डाऊन चे शस्त्र उपसण्यात आले ..पण ‘कोरोना ने गळे घोटले आणि लॉक डाऊन ने उपाशी मारले ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली . त्यात गरिबांची परिस्थिती पाहून त्यांना समजावून घेत ,त्यांना कमजोर न करता कोरोनाशी दोन हात करू पाहणाऱ्या प्रशासनातील मराठी अधिकारी आता शहरात उरले नाहीत . अशा अवस्थेत आता उद्या रात्री पासून सुरु होणारा लॉक डाऊन कसा असेल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे . कोरोना हा इतिहास अधोरेखित करणार तर आहेच पण याच इतिहासातील पुण्यातील लढाई ची हि पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातील असा दावा हि केला जातो आहे.