पुणे- आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ मंदिरे खुली करण्याचे करण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी पुणे आणि राज्यभर विविध मंदिरे भाविकांसाठी खुली झाली .
आज (दि.१६) सकाळी सहा वाजल्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, तमाम भाविकांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यातच मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. मात्र यादरम्यान देवाचे उपचार नैमित्तिक परंपरा अखंड सुरु होते. सोशल मीडियावर दैनंदिन माउलींचे समाधी दर्शन सुरू होते. मात्र राज्य सरकारने सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर माऊलींचे समाधी मंदिर सकाळी सहापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान पहाटे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माऊलींची विधिवत महापूजा होईल.
भाजप आणि साधू संतांच्या संघर्षाला यश येउन धार्मिक स्थळ उघडण्याच्या निर्णय झाल्याचा दावा करत भाजपच्या प्रवक्त्यांनी पुण्यातील उपलक्ष कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात गणरायाच्या,पांडूरंगरखमाईच्या च्या,गुरुदेव दत्ताच्या,शनीदेवाच्या आणि पालवबाबा समाधीचे दर्शन घेतले .यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते मंदिरास भाविकांच्या सुरक्षेसाठी हॅंडस् फ्री सॅनिटायझर यंत्र भेट देण्यात आले .
भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे म्हणाले राज्य सरकारने सोमवारपासून मंदिर उघडे करण्याचा अध्यदेश काढला यानिमित्त मॉडेल कॉलनीतील केदारनाथ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले यानिमित्त केदारनाथची आरती माझ्या हस्ते करण्याचा बहुमान विश्वस्तांनी दिला . हा माझा भाविकांनी केलेला सन्मान आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट आकर्षक रांगोळीच्या मांडणीसह सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व भाविकांसाठी खुले झाले. अंबाबाई दर्शनाचा पहिला मान कोव्हिड योध्यांना देण्यात आला. यावेळी पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी आलेल्यांचे स्वागत केले. तसेच आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मंदिर खुले झाले असले तरी भाविकांना केवळ सहा तासात दर्शन घेता येणार आहे. देवस्थान समितीने दर्शनासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी 4 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन वेळ निश्चित केली आहे. सध्या भाविकांना मंदिरात पूर्व दरवाजातून प्रवेश करता येणार आहे. तसेच गाभाऱ्यात थेट प्रवेश न देता कासव चौकातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय केली आहे. कोरनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भक्तांना ऑटोमॅटिक सॅनिटायझर दिले जाते तसेच तापमान तपासणी ,आवारात मास्क नसल्यास प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अख्त्यारीतील प्रमुख अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिरे आज खुली झाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घेतलं जात आहे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवत सारसबागेतीळ मंदिरामध्ये भाविकांना दर्शन देण्यात येत आहे.
सकाळपासून सिद्धिविनायक मंदिर चार वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले. क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे नियम पालन करुनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे असल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.
आजपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जेजुरीगड भाविकांसाठी देव दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीतच भाविकांना देव दर्शन घ्यावे लागणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले. पहाटे साडे पाच वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक कुलदैवत खंडोबाची महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
शिर्डीचे साई मंदिर आजपासून पुन्हा उघडण्यात आले आहे. काकड आरतीनंतर साई दर्शनाला सुरुवात झाली. आठ महिन्यांनंतर मंदिंर खुले झाले आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांची दर्शनाला गर्दी होत असून पहिलाच दिवस असल्याने आलेल्या भक्तांना आयडी कार्ड पाहून दर्शनाला सोडत आहे. प्रवेश क्रमांक दोनवर मोठी रांग बाहेर लागली आहे.
कोरोनामुळे मागच्या आठ महिन्यापासून बंद असलेले मंदिरे आज पाडव्याच्या मुहूर्तावर उघडले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बीडमधील परळीचे प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सकाळी पाच वाजताच उघडले. नेहमीप्रमाणे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करायचे. आज पुन्हा आठ महिन्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी भाविक पहाटेच पोहोचले होते. शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाळून या वेळी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. आज थेट गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश देण्यात आला नाही मात्र मुखदर्शन खुले करण्यात आले आहे.
आज दिवाळी पाडव्यानिमित्त आज मंदिर विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज झाले आहे. आठ महिन्यांनी विठुराया आणि भाविकांची भेट झाली आहे. पहिल्या भाविकाने सकाळी सहा वाजता दर्शन घेतलं. तापमान तपासून भाविकांना आत सोडलं जात आहे. तर तीन वेळा सॅनिटाईज केलं जात आहे.