पुणे, 23 मे : सध्याची चौथ्या कोरोना टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर म्हणजे ३१ मे नंतर पुणे महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीत सुरु केली जावीत. त्याचबरोबर शहरातील खासगी कार्यालयेही सुरु करावीत आणि सध्या सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत असलेली संचारबंदी रात्री ११ ते सकाळी ७ या कालावधीपुरतीच सुरु ठेवली जावी अशी शिफारस राज्य शासनाला केल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आपण या सूचना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या टाळेबंदीची मुदत संपल्या नंतर च्या काळात पुणेकरांना जास्तीत जास्त सवलती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरु असून त्यावेळी परिस्थिती आणखी सुधारल्याचे निश्चितपणे जाणवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पुण्यातील एकदा सुरु झालेली दुकाने किंवा व्यवसाय काही कारणासाठी पुन्हा बंद कारण्याबद्दलचे कोणतेही आदेश आपण दिले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.