पुणे-
राज्यातील ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड जनरल सेक्रेटरी सुभाष जाधव उपाध्यक्ष आबासाहेब चौगुले दत्ता डाके यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ महाविकास आघाडी सरकारने ऊस तोडणी कामगार मुकादम वाहन मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्याच्या कार्यालयाचे उद्घाटनही झाले प्रतिनिधी स्वरूपात दहा कामगारांना ओळखपत्रही दिले परंतु त्या मंडळाचे कामकाज अद्यापही सुरू झालेले नाही तसेच ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना कुठल्याही योजना किंवा लाभ लागू केलेले नाहीत.
सदरचे महामंडळ बंद पाडण्याचा डाव सुरू आहे त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र आसंतोष आहे या पार्श्वभूमीवर कल्याणकारी मंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे. ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना ओळखपत्र द्यावीत मुकादम व वाहन मालकांची थकीत बिले त्वरित अदा करावीत तसेच विमा योजना घरासाठी अनुदान पाल्यांसाठी शिष्यवृत्ती अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने 20 सप्टेंबरला धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी 24 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये भव्य परिषद घेण्यात आली तसेच राज्यात ऊस तोडणी कामगार मुकादम मालकांच्या बैठका सुरू आहेत. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतील.
महाविकास आघाडी सरकारने जरी महामंडळ स्थापन करून कार्यालय सुरू केले असले तरीसुद्धा झालेल्या निर्णयानुसार साखरेच्या उत्पादनाच्या प्रत्येक टना मागे दहा रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांनी निधी द्यायचा आहे व तेवढाच निधी राज्य सरकारने द्यायचा आहे याबाबतीतही साखर कारखान्यांनी एक रुपयाही अद्याप दिलेला नाही व साखर कारखानदार व सरकार या दोघांचा मिळून हे कल्याणकारी मंडळ बंद पाडण्याचा डाव दिसून येत आहे.
ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांच्या मतावर अनेक नेते निवडून येतात सत्तेमध्ये जातात मंत्री होतात परंतु ऊस तोडणी कामगार मुकादम वाहन मालकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र संतोष आहे.मुख्यमंत्र्यांनी ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर डी एल कराड, सुभाष जाधव ,आबासाहेब चौगुले दत्ता डाके यांनी केली आहे.