खा. बापट -जावडेकर-मोहोळ – बिडकर यांच्याकडून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली
साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ता अशी ओळख असलेले बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. हे वास्तव फार दुःखदायक आणि क्लेशकारक आहे. शिवस्तुती हा त्यांचा आत्मा होता. तोच त्यांचा श्वास होता. त्यासाठी ते जगभर भटकले. शिवसृष्टीची साधने गोळा करून ती त्यांनी जनसामान्यांसमोर आणली. तब्बल तीन पिढ्यांपर्यंत शिवरायाचे कर्तृत्व त्यांनी पोहोचविले.शिवशाहीचे मराठी आणि महाराष्ट्रीयन पैलू बाबासाहेबांनी त्रिखंडात नेले. शब्द अपुरे पडावेत इतके त्यांचे कर्तृत्व मोठे होते. असा शिवशाहीर पुन्हा होणे नाही. त्यांना माझा सलाम आणि भावपूर्ण श्रध्दांजली.
खासदार गिरीश बापट.
इतिहासाचा एक मोठा अध्याय संपला. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि पराक्रम घराघरांत पोहोचविले. तीन पिढ्यांवर त्यांनी अद्भुत प्रभाव पाडला. चौथीमध्ये असताना त्यांच्या राजा शिवछत्रपती पुस्तकांचे दहाही खंड मी वाचले. त्यावरून शिवाजी महाराजांचे शंभर पानी चरित्र लिहिले. असा त्यांचा सर्वांवर प्रभाव असायचा. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
खासदार प्रकाश जावडेकर
“पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची अनन्य भक्ती केली. त्यांच्या लेखणीचा, व्याख्यानांचा, महानाट्याचा आणि एकूणच जगण्याचा विषय शिवरायच होते. त्यांनी लेखन, वक्तृत्त्व, नाटके, गडकोट मोहिमा या सर्व माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत घराघरात पोहोचवला, मनामनात रुजवला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे शिवरायांच्या पालखुणा आहेत त्या साऱ्या गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन आणि तिथला इतिहास जागवून ते नतमस्तक झाले.बाबासाहेबांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आज ते देहरुपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यारूपाने ते भावी पिढ्यांना शिवरायांचा इतिहास सांगत कायमच प्रेरणा देत राहतील. पुणे महानगरपालिकाही वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृती यथोचित जपण्याचे काम नक्कीच करेल. त्यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली’.
मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे
‘शिवचरित्र’ घरोघरी पोहचविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. शिवप्रेम म्हणजे काय, हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनमाणसात पोहचविले. शिवरायांच्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी अनेक गडकिल्ले पालथे घातले. महाराजांची माहिती, संदर्भ, याचा अभ्यास तसेच संशोधन करून शिवशाहिरांनी केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगामध्ये शिवाजी महाराजांची किर्ती पोहचविली. असा शिवभक्त पुन्हा होणे नाही.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका