पुणे- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उमुख्यमंत्री अजितदादा पवार, विपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वार्तांकन करावयास सभागृहात प्रवेश करताना काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींना झालेल्या धक्कबुकी प्रकरणामुळे आज महापौर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी महापौर कार्यालयात उपस्थित रहाणे टाळून महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोरील हिरवळीवर आम्ही चंद्रकांतदादा यांच्याशी बोलू असा पवित्रा घेतला . महापौर कार्यालयात काही माध्यमांच्या प्रतीनिधींसमवेत या वेळी आपली पत्रकार परिषद उरकून चंद्रकांतदादा आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी हिरवळीवर थांबलेल्या ‘या ‘ माध्यम प्रतिनिधींशी बातचीत केली . आणि यावेळी त्यांनी त्या धक्काबुक्की बाबत दिलगिरीही व्यक्त केली. ज्यांना धक्काबुक्की झाली त्यांनी याप्रकरणी खंबीर पवित्रा घेतला तसेच एन यु जे च्या महाराष्ट्रप्रदेश अध्यक्षा शीतल करदेकर ,मराठी पत्रकार परिषदेचे सुनील लोणकर यांनी या धक्काबुक्कीचा निषेध व्यक्त केला होता .
वास्तवता….नेमके झाले तरी काय होते ….
1 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे नियोजन महापौर ,नगरसचिव या दोहोंच्या कार्यालयाकडून करण्यात आले होते . यावेळी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सभागृहात गर्दी नको म्हणून त्यांनी माध्यमांच्या कॅमेरांना देखील सभागृहात मज्जाव करण्याचे धोरण अंगीकारत त्यांना पत्रकार कक्षातून चित्रीकरण करण्यास सांगितले. जो पत्रकार कक्ष प्रत्यक्षात व्यासपीठाच्या मागे आहे.सभागृहात असलेल्या व्यासपीठा समोर मात्र महापालिकेच्या वतीने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे,आणि अन्य असे सुमारे ५ ते ६ कॅमेरे, संगणक आणि त्यांच्या सहायकांना हवी ती सुविधा पुरविण्यात आली होती . व्यासपीठा समोर यांच्यासह अन्य एका बड्या वाहिनीचा कॅमेरा नंतर समाविष्ट झाला. पत्रकार आणि माध्यमांच्या अन्य कॅमेरांना व्यासपीठाच्या मागे वरच्या बाजूला असलेल्या पत्रकार कक्षातूनच वार्ताकन,चित्रीकरण करण्यात सांगण्यात आले होते .पत्रकारांची येथून वार्तांकन करण्यास हरकत नव्हतीच . परंतु येथून आम्ही फोटो कसे काढणार .. नेत्यांची भाषणे आणि चित्रीकरण कसे करणार ? हा प्रश्न नेहमीप्रमाणे आ वासून या कॅमेरामन पुढे उभा होता .त्यामुळे नामवंत अशा वृत्तपत्राच्या छायाचीत्रकारांना हि मनस्ताप होताना दिसत होते. त्यात त्यांना सभागृहातील हे ५/६ कॅमेरे दिसत होते त्यामुळे काहीना सभागृहात मुक्त प्रवेश मिळतो आणि काहीना अशाप्रकारे दूर ठेवले जाते हि भावना बळावली आणि अखेरीस वाहिन्यांच्यासह काही वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी देखील सभागृहात जाण्यासाठी धाव घेतली . तिथे त्यांना पोलिसांनी नव्हे तर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि यावेळी प्रत्यक्षात कार्यक्रम सुरु होऊन पुढे वेगाने सरकत होता . या स्थितीत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धक्काबुक्कीत वरिष्ठ प्रतीनिधीनाही अवमानित होण्याची वेळ आली. एकाचे घड्याळ हरविले. तर चांगलीच जोरदार बाचाबाची झाली .
चूक कोणाची -जबाबदारी कोणाची ?
कोरोना काळात खबरदारी म्हणून गर्दी होऊ नये म्हणून घेण्यात येणारी खबरदारी महापौर आणि नगरसचिव कार्यालयाने निश्चितच घ्यायला हवी याबाबत कोणाचे दुमत नाही . पण हि खबरदारी घेताना सर्वांना एकच न्याय ..या पद्धतीचे आचरण निश्चित असायला हवे. सभागृहात कॅमेरा नको तर कुणाचाच नको हि भूमिका घेतली गेलेली दिसली नाही. व्यासपीठाच्या पुढे ठेकेदाराची सुमारे १० जणांची टीम चित्रीकरण आणि फोटोग्राफीसाठी ठेवणाऱ्या या कार्यालयाने त्यांची काळजी घेतली तशी माध्यम प्रतिनिधी आपले काम व्यवस्थितपणे कसे करू शकतील याबाबत मात्र पर्वा केली कि नाही याबाबत चौकशी गरजेची आहे . सभागृहातील व्यासपिठा समोर सर्वात मागील आणि मध्य बाजूस एक तात्पुरता पण भक्कम उंचवटा करून तिथे कॅमेरामन साठी जागा करवून देता येणे शक्य होते. अशा प्रकारची जागा असंख्य बड्या कार्यक्रमांना करवून दिली जाते .पण याबाबत कोणी का विचार केला नाही हाही प्रश्न आहेच .