पुणे-महाराष्ट्राचे सहकार चळवळीतील योगदान मोठे आहे. त्यामुळे पुण्यात सहकार विद्यापीठ सुरू करावे अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
बापट यांनी यासंदर्भात अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सहकार चळवळ हा भारतातील ग्रामीण समाजाच्या प्रगतीचा मुख्य आधार राहिला असून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या गरीब कल्याण आणि अंत्योदयाची विचारधारा वाढविण्यासाठी सहकार चळवळीची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची घोषणा केली. या मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून अमित शहा यांना जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात सहकारही देशासाठी नव्या सामाजिक भांडवलाची संकल्पना तयार करेल.
देशाच्या सहकार चळवळीत महाराष्ट्र राज्याचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही सहकार चळवळीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे बापट यांनी सांगितले.