पुणे-आपला भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असताना हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव ज्यांच्या बलिदानामुळे आज आपणास पाहायला मिळत आहे, अशा विविध स्वातंत्र्यवीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच नव्या पिढीला या वैभवशाली स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास समजावा हाच या मशाल रॅलीचा मुख्य हेतू असल्याचे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप यांनी सांगितले.
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या रॅलीत सुमारे १०० ते १५० महिला भगिनींचा पारंपारिक वेशभूषेत सहभाग होता तर जवळपास ५०० ते ७०० पुरुष कार्यकर्त्यांनी देखील यात सहभाग नोंदवला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झालेली पुणे स्टेशन- कलेक्टर कचेरी- 15 ऑगस्ट चौक- कमला नेहरू हॉस्पिटल – पवळे चौक- शनिवार वाडा- पुणे महानगरपालिका- जंगली महाराज रस्ता- बालगंधर्व चौक- संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक-
मॉर्डन कॉलेज ते पुन्हा बालगंधर्व – काँग्रेस भवन मार्गे या रॅलीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मध्यवर्ती कार्यालयात समारोप झाला. या समारोपाच्या वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मरण पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती लावत दोन मिनिटांसाठी स्तब्ध उभे राहत सर्व हुतात्म्यांना आदरणीय वाहिली.
रॅलीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी
असताना देखील कुठेही आरडा- ओरड नाही , हुल्लडबाजी नाही ही या यात्रेची खास वैशिष्ट्य ठरली. या रॅलीतील प्रत्येक वाहनावर देशाचा तिरंगा डौलात फडकत होता. रॅलीच्या मार्गावरील विविध महापुरुषांच्या स्मारकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी अभिवादन देखील केले.
या रॅलीप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, अंकुश काकडे,रवींद्रआण्णा माळवदकर,अशोक कांबळे,संदीप बालवडकर,प्रदीप देशमुख,मृणालिनीताई वाणी,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.