पुणे- लोकनियुक्त प्रतिनिधींच्या लोकशाही राजवटीला डावलून आलेली प्रशासक राजवट आता निवडणुकाच वारंवार डावलल्या जाऊ लागल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. ७४ वी घटनादुरुस्ती , आणि कायदे ,नियम डावलून प्रशासक राजवट लादली जातेय असा मतप्रवाह जनतेत असताना आज पुणे महापालिकेत येऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर यासंदर्भात गंभीर आरोप केलेत .हे दोघेही स्वतःच्या स्वार्थासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र -यांचे मिळून ई डी सरकार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये सत्त्तेचे विकेंद्रीकरण करुन कामाचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, सध्या सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक सरकारने लवकर घेतल्या पाहिजे . सत्ताधारी हे त्यांच्या फायद्यासाठी लवकर निवडणूक घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. प्रशासन नागरिकांना वेळ देत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. नगरसेवक प्रशासनाकडे दाद मागू शकत नाही.मागील अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी ईडी सरकारकडे करीत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका घेत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नाहीत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे. या गोष्टीच उत्तर ईडी सरकारने द्यावे, यावर हे सरकार भूमिका मांडणार नाही. त्यामुळे या ईडी सरकार निषेध व्यक्त करित खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला.
एकनाथ शिंदे तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना आव्हान देण्याचे काम करत आहेत
एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही चालणारे त्यांचे शिवसैनिक आहोत असे सांगून शिवसेना आमची आहे असे सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंवर सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रहार केला आहे. त्या म्हणाल्या आपल्या हयातीतच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे आणि आपले उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली . आणि त्यांच्याकडे सारे सुपूर्त केले. आता एकनाथ शिंदे हे त्याच बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना आव्हान देऊ पाहत आहेत . जर उद्धव ठाकरेंना विरोध होता तर त्यांनी तेव्हाच आपले वेगळे घर करायला हवे होते .
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीबाबत महविकास आघाडी यांची अंतर्गत बैठक होऊन त्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारच्याच डेटानुसार मागील तीन वर्षात सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहे. याकाळात अडीच वर्ष सरकार महविकास आघाडीचे होते. त्यात सर्वाधिक उद्योग पुण्यात सुरू झाले, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, सध्या पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली असून कोयता गँगची गुन्हेगारी ही मागील तीन ते चार महिन्यात समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरातून कोणता प्रकल्प राज्याबाहेर जात नाही. उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांचा प्रकल्प विस्तारित करत आहेत. पुणे हा मोठा जिल्हा असून सक्षम पोलीस यंत्रणा असतानाही गुन्हेगारी वाढलेली आहे.
अब्दुल सत्तार बारामतीत
मंत्री अब्दुल सत्तार हे बारामती दौऱ्यावर येत आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणाची बातमी होत नाही. त्यामुळे आमच्याबद्दल कोणी बोलत असेल तर ते ऐकून घेण्यास आम्ही दिलदार आहे.
नरेंद्र मोदी शिवाय भाजपला पर्याय नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे भक्कम नेत्यांची फळी होती. परंतु तशी फळी आता दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मला काळजी वाटते की, ग्रामपंचायत निवडणूक ते संसद निवडणुकीसाठी त्यांना सर्वत्र पळावे लागत आहे. शिवसेना पक्षाची स्थपना ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीत दहा वर्षे उद्धव ठाकरे हे उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्यांनी कारभार पहिला. त्यामुळे तुम्हाला वेगळा विचार असेल तर वेगळे पर्याय शोधा आणि त्यानुसार वेगळी वाटचाल करा. दुसऱ्याच्या गोष्टीवर हक्क गाजवू नका, असा टोला सुळे यांनी लगावला.