पुणे-‘ काश्मीरचा इतिहास प्रेम, समन्वय, सलोख्याचा आणि सर्व धर्माच्या सहअस्तित्वाचा आहे. काश्मीर हे जागतीक ज्ञानाचे प्रदीर्घकाळ ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. काश्मीर हे केवळ प्रेमानेच जिंकता येते, त्याच्यावर बळजबरी झाल्यास काश्मीर बंड करते, हाही इतिहास आहे, ३७o च्या उरल्या सुरल्या तरतुदी चुकीच्या पद्धतीने दडपशाहीचे वातावरण निर्माण करत रद्द करुन आपण काश्मीरींचा विश्वास गमावला आहे. तो आत्या पुन्हा प्राप्त करणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे ‘ असे प्रतिपादन लेखक संजय सोनवणी यांनी केले.
‘ काश्मीर : काल, आज आणि उद्या ‘ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
गांधी भवनच्या सभागृहात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी हे व्याख्यान झाले.
अध्यक्षस्थानी अन्वर राजन हे होते
सोनवणी म्हणाले, “काश्मीरच्या रक्तातच कडवेपणा नाही. तेथील मुळचा बौद्ध असलेल्या राजा रिंचेनला हिंदू धर्मात प्रवेश नाकारल्यामुळे त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला लागला. डोग्रा घराण्याच्या राज्य काळात तेथील मुस्लिमांचे दमन झाले. अनेक अन्यायकारक कर लादत त्यांना भुमीहीन करण्यात आले. असंतोष निर्माण झाला. काश्मीरी पंडित आणि मुस्लीम यांच्या सहअस्तित्वात मुलतत्ववाद्यांमुळे दरी निर्माण करायला हे घटक कारणीभूत झाले. काश्मीर प्रश्नाला हे दमन सर्वाधिक कारणीभूत आहे.
“जमीनी खरेदी बाहेरच्यांना रोखण्याचा कायदा ब्रिटिशांना रोखण्यासाठी आला. कलम ३७० कोणाच्या चुकीने आले हे समजून घेतले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, “हरीसिंग यांच्या आग्रहामुळे ३७० कलम आले. तरी पंडित नेहरूंना दोष दिला जातो आहे आणि डॉ.आंबेडकर यांचा विरोध असल्याचा खोटा प्रचार केला जातो. भारताने मुत्सद्दीपणाने कलम ३७o पातळ केले. १९५४ मध्येच काश्मीरला काश्मीरच्याच राज्यघतनेत भारताचा अविभाज्य भाग ठरवण्यात आले आणि लगेचच घटनासमितीही बरखास्त करण्यात आली.
राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने केंद्राचे अधिकार वाढवत केंद्र-राज्य संबंधातील ९७ पैकी ९४ तरतुदी रद्द करण्यात आल्या. उरलेल्यापैकी जमीन खरेदीचे अधिकार हे इतर राज्यात देखील नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेतले पाहिजे.३७० कलम रद्द होणे म्हणजे काश्मीरचा सामीलनामा रद्द होणे होय. त्यामुळे ३७० कलम आजही पुर्ण रद्द करण्यात आलेले नाही पण तसे केल्याचा भ्रम मात्र निर्माण करण्यात आला आहे.
“काश्मीरमधील दमनाच्या असंतोषाविरूध्द लिबरेशन फ्रंटचा जन्म झाला. तोपर्यंत प्रशासन आणि सर्व स्तरावर पंडितांचे वर्चस्व होते. त्या वर्चस्वाला आव्हन देणे हा दहशतवाद्यांचा हेतू होता. १९८९-९० मध्ये झालेले पंडितांवरचे खुनशी हल्ले हे दमन आणि धर्म यांचे भेसळ करत केले गेले.
हिमाचल, आसाम, नागालँड येथेही जमीनी खरेदी करता येत नाहीत. आदिवासी, तसेच वतनाच्या जमीनीही खरेदी करता येत नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आपण फसवले गेलो आहोत, बळाच्या जोरावर आपल्याला वागवले जात आहे, असे अविश्वासाची भावना आज काश्मीरमध्ये आहे. त्यामुळे हे एकसंध राष्ट्र म्हणून उभे राहणार का ? याचा अंदाज आपण करू शकतो, असेही ते म्हणाले.
सोनवणी म्हणाले, ‘आज काश्मीरची अर्थव्यवस्था ढासळली आहे. काश्मीरचे पर्यावरण नाजूक असल्याने तेथे उद्योग वाढीस मर्यादा आहेत, हे सांगीतले जात नाही. स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय जगात कोठेही उद्योग उभारला जाऊ शकत नाही. जैतापूरचे उदाहरण अगदी ताजे आहे.
जागतिक वातावरणही अनुकुल आहे, आणि तसेच राहील , असे सांगीतले जात आहे. तसेच लष्कर किती काळ ठेवणार , हाही प्रश्न आहे.
जगातील कोणताही प्रश्न प्रामाणिकपणा असेल तर गांधीजींच्या मार्गाने सुटू शकतो, असेही सोनवणी यांनी सांगीतले.
काश्मीरींचा आता विकास करू, असे पंतप्रधान म्हणत आहेत, मग, आधी कोणी अडवले होते, असा सवालही त्यांनी केला.
“काश्मीरच्या भूमीत आपल्याला रस आहे, काश्मीरींमध्ये रस नाही, हे दुःखदायक आहे, तेथील जनतेत अविश्वास वाढवत नेणे चुकीचे ठरू शकते. काश्मीरींना त्यांची चांगली – वाईट , जी असेल ती प्रतिक्रिया व्यक्त करू द्यायला हवी होती “,असे अन्वर राजन यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना सांगीतले . काश्मीर हा आपला बंधू आहे की बंधक आहे ? असा सवालही त्यांनी केला.
डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘युक्रांद ‘ शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार झरेकर यांनी संयोजन केले. अतुल नंदा यांनी प्रास्ताविक केले. कमलाकर शेटे यांनी आभार मानले.