डॉ. ए.ए. कुलकर्णी व योगाचार्या मारूती पाडेकर गुरूजी यांना जीवन गौरव पुरस्कार
पुणे, दि. ३० नोव्हेंबर:“ मानवजातीच्या उद्धारासाठी संतानी या सृष्टीवर जन्म घेतला आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांनी आपल्या वाणीने सर्वांच्या अहंकाराला छेद दिला आहे. मानवाला खर्या आनंदाचा शोध घ्यावयाचा असेल तर संतांच्या चरणी आपले मस्तक ठेवावे. आपल्या व्यवहार आणि वाणीने त्यांनी सर्वांचे कल्याण केले आहे.”असे विचार प्रेम शक्ती पीठाच्या संस्थापिका व आध्यात्मिक गुरू साध्वी ऋतंभरा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होते.
या प्रसंगी जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, युएसए येथील लेखक व विचारवंत प्रा. राम चरण, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, यूएसए येथील टेक्नॉलॉजी होल्डींग एलएलसी चे कार्यकारी संचालक व सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. मिलिंद पत्रे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण आणि डॉ. राजीव ठाकुर हे उपस्थित होते.
साध्वी ऋतंभरा म्हणाल्या,“ मनातील एक कोपरा असा असतो, जो या संसारातील भौतिक पदार्थांमध्ये रमत नाही. तेव्हा तो भगवंताला आवाज देतो. हेच काम संतांनी केले. मला कशासाठी जगायचे आहे, हे अद्याप कोणालाही ठावूक नाही, परंतू संतांनी आपल्याला जगण्याचा खरा अथर्र् सांगितला आहे. त्यांनी संपूर्ण मानवजातीचा उद्धार केला. खर्या आनंदाचा शोध घ्यावयाचा असेल तर संतांच्या विचारप्रमाणे वाटचाल करावी. मनाच्या गुलामी नंतरच व्यक्ती सर्व गोष्टींचा गुलाम बनतो. परंतू आपल्या व्यवहार आणि वाणीने संतांनी चित्तचेतनेला कधीही गुलाम बनू दिले नाही. संतांना भेटल्यानंतर या संसारात काहीच करण्यासारखे उरत नाही. त्यांनी जो मार्ग दाखविला आहे, तोच या विश्वाला शांततेचा मार्ग दाखविणारा आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ व्यवस्थापनशास्त्र हे एक प्रगत शास्त्र समझले जाते. ते आंतरशाखीय विज्ञान आहे. व्यवस्थापनशास्त्राची अनेक मॉडेल्स आहेत. उदा. अमेरिकन व्यवस्थापन शास्त्र, जॅपनीज व्यवस्थापन शास्त्र इ. पण भारतीय व्यवस्थापन शास्त्र ही गोष्ट आपण कधीही ध्यानात घेत नाही. अमेरिकेत हायर अॅण्ड फायरचे तत्व आहे, जपान मध्ये कामगार इतके काम करतात की अखेर त्यांना काही कामच उरत नाही. त्यांची हाराकिरी प्रसिद्ध आहे. भारतात मात्र असे काहीच नाही. आपल्या देशात राजा हा प्रजेचा प्रतिपालक मानला गेला आहे. तीच गोष्ट एखाद्या कारखान्याच्या मालकाबद्दल आहे. अनेक प्रसंगी नियमांना मुरड घालून कामगारांना सवलत दिली जाते व तेही त्याची परतफेड करतात. मालकाने विश्वस्त भावनेने वागावे, असे महात्मा गांधी म्हणत.”
डॉ. अशोक जोशी म्हणाले,“आपली दृष्टी जशी असेल तसे आपल्याला जग दिसते. म्हणून कायमच सकारात्मक दृष्टीकोण असावा. भारताने सदैव वसुधैव कुटुम्बकम म्हणजेच सर्व जग एकच परिवार आहे ही धारणा स्वीकारली आहे. या देशाने संपूर्ण जगाला अनेक महत्वाची तत्वे दिली आहेत. प्रत्येकाने स्वतः निर्णय घ्यावा हे जगातील १० सर्वोत्तम उद्योजकांपासून काढलेले अनुमान आहे. तसेच प्रत्येकाने भुतकाळात रमण्यापेक्षा वर्तमान काळात जगणे शिकावे. तसेच, आपले विचार आणि मते व्यक्त करण्यसाठी वकृत्व कला ही शिकणे गरजेचे आहे.”
प्रा. राम चरण म्हणाले,“ भारताला हजारो वर्षांची परंपरा असून येथे त्याग, समर्पण आणि प्रतिभा ही मूल्ये आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा या जगाचा निरोप घेऊन जावू, तेव्हा काही तरी चांगल्या गोष्टी मागे सोडून गेेले पाहिजे. व्यावहारीक जगात आपल्याला अहंकारावर ताबा मिळविता आला पाहिजे. देशात बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आ वासून उभी आहे. यातूनच एका देशाचे नकारात्मक चित्र उभे राहते. अनेक पदवीधर नोकरी मिळवितात पण त्यांना त्यात आनंद मिळत नाही. देशातील बर्याच समस्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपला दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. ”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले,“ सृष्टीवर तिसरे महायुद्ध झाले नसले, तरी कोरोनाच्या माध्यमातून खूप मोठी हानी झाली आहे. त्याचा परिणाम हा प्राणी व वनस्पतींच्या जगावर सुद्धा झालेला आहे. याची रचना एखाद्या पिरॅमिड प्रमाणे आहे. संपूर्ण मानवजात ही एका अत्यंत कठिण प्रसंगातून जात आहे. टिकाऊ स्वरूपाचा विकास हे आमच्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. विश्व शांतीच्या मार्गाने जाणे, हे सर्वात चांगले पाऊल असेल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञानेश्वर तुकाराम यांचा संदेश समाजापुढे मांडण्याच्या उद्देशाचे ही व्याख्यानमाला गेली २५ वर्षापासून भरविली जात आहे. विश्व शांती विद्यापीठात परदेशातील विद्यार्थ्यांंनी शिक्षण घेण्यासाठी यावे अशी शिक्षण पद्धती निर्माण केली जाईल. संतांच्या मार्गांवर चालल्यास मानव जातीचे कल्याण होईल. या करीताच ही व्याख्यानमाल आहे. हुशार विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, महात्मा गांधी यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ”
या प्रसंगी एमआयटी एसओएमचे माजी संचालक डॉ. ए.ए. कुलकर्णी आणि योग प्रशिक्षक योगाचार्य श्री मारूती पाडेकर गुरूजी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राहुल विश्वनाथ कराड यांनी व्याख्यानमालेची माहिती दिली. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. एन.टी.राव यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.