पुणे – राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची मागणी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
मुळीक म्हणाले, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने दिलेले नाहीत. त्यासाठी कोणते कारण ही सांगितले नाही. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मात्र परंपरेने दिले जात आहेत. राज्याचे धोरण शिक्षकांवर अन्याय करणारे आहे.
मुळीक म्हणाले, ‘गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाहीत. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही या वर्षी त्यासंबंधीचे कोणतेही परिपत्रकदेखील जारी केले नाही. दोन वर्षांतील पात्र शिक्षकांना पुरस्कार आणि दोन वेतनवाढीपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करावेत.
मुळीक पुढे म्हणाले, शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी प्रशिक्षणाची जाचक अट, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे थकीत वेतन, सेवानिवृत्त शिक्षकांची परवड आदी विषयांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे.