पुणे-
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले आहे. गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर फडणवीसांनी आपल्या खात्याचा राजीनामा द्यावा, असे त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्यात.
राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दौंडमध्ये एकाच कुंटुबातील 7 जणांची हत्या, पुण्यातील कोयता गँगचा हैदोस, महिलांवर सातत्याने होत असलेले अत्याचार आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळें म्हणाल्या की, शिंदे – फडणवीस सरकारला ईडी सरकार म्हटलेले आवडते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यापुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. गृह मंत्र्यालयाचे हे अपयश आहे. राज्यातील कायदा-सुवस्था राखता येत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, हे माझे वैयक्तिक मत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.
कसब्यामध्ये भाजपचे झेंडे-आचारसंहितेचा भंग:कारवाई काहीच नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कसब्यामध्ये भाजपचे झेंडे लागलेले दिसून येतात, त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून येत असले तरी भाजपवर काहीच कारवाई होत नाही, यात काहीच मला आश्चर्य वाटत नाही, कारण हे सरकार नियमाने चालत नाही कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येईल असेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या राज्यात राबविल्या जात नाही, मात्र माझ्या मतदारसंघात राबविल्या जातात असे सांगताना अजित पवार पालकमंत्री असताना नेहमी जनतेसाठी उपलब्ध असायचे, शनिवारी लोकांना वेळ देत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजेत, केंद्र सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.