पुणे-भारताला जोडण्याची गरज नसून त्यांनी काँग्रेस पक्षाला जोडावे. राहुल गांधी यांना केरळमधूनही हरवणार आहोत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी स्वीकारत नाहीत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नहीं. असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला. राहुल गांधींनी सुरु केलेली ‘भारत जोडो यात्रा’ ही काँग्रेस कमकुवत करणारी यात्रा असून त्याचा कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार नाही. सत्तेत असताना त्यांच्याकडे देश जोडण्याची कोणतीही भूमिका नव्हती. भारताला जोडण्याची गरज नसून त्यांनी काँग्रेस पक्षाला जोडावे, जी २३ गटाला जोडावे. कोणताही चेहरा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आला तरी फरक पडणार नाही. देशाचा विकास आणि आगामी लोकसभा निवडणुकीत चारशेहून जागा मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे,असे आठवले यांनी सांगितले.
बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे, पण आमचाही किल्ला आहे. दलित आणि धनगर समाजाची चांगली मते आहेत. महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे कमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे बारामतीही आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे आठवले यांनी सांगितले.
आठवले पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मॉरिशस मराठी मंडळी संस्थेतर्फे २७ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने डॉ. आंबेडकरांचा पुतळा तयार केला आहे. पुतळ्याचे अनावरण होणे ही आंबेडकरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.