पुणे : उत्तरप्रदेश मधील लखीमपूर (lakhimpur) घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापारी वर्ग, भाजी मार्केट यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रॅली, मोर्चा काढून बंद ला पाठिंबा देत आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप , शिवसेनेचे संजय मोरे तसेच मोहन जोशी, रघुनाथ कुचिक ,नितीन पवार आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची अफाट गर्दी झाली होती
”एका बाजूने महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. दसऱ्याला रावण दहन केले जाते. श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य सुरु आहे. सर्व शेतकरी संघटना, आघाडीचे तिन्ही पक्ष, सर्वसामान्य जनता, एकत्र येऊन लखीमपूर घटनेचा निषेध करत भाजप रावणाचे दहन करणार आहोत. असा हल्लाबोल कदम यांनी केंद्रावर (central government) केला आहे.”
”शेतकरी कायद्याच्या विरोधात अन्नदाता अकरा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान केंद्रातील मंत्री त्यांच्याकडे डुंकूनही बघत नाहीत. त्यानंतर लखीमपूर घटनेत आपले शेतकरी भावंडं आंदोलन करताना त्यांना चिरडून टाकण्याचं काम भाजप मंत्र्याच्या मुलाने केले आहे. आपल्या देशातील ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले आहेत.”
जातीवादाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली
”शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपले पूर्वज कशी ना कधी शेतकरी होते. याआधी सुद्धा भाजपने शेतकरी आंदोलनात अन्नदात्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या केली होती. आता हि लखीमपूरची घटना घडली आहे. देशात जातीवाद वाढत चालला होता. त्याला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार केले. दोन महिन्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटींचे कर्जमाफ केले. याच काळात नकळत फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामध्ये हे भाजप सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे. अत्याचारी रावणाचे दहन करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. दरम्यान, परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने शंभर टक्के बंद यशस्वी झाला असल्याचे सांगण्यात आले.
उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व चिड आणणारा आहे. याच निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी पायी मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा धायरी येथील भैरवनाथ मंदिर ते वीर बाजी पासलकर पुलापर्यंत काढण्यात आला.
”शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारच्या वतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. ब्रिटिश राजवटीपेक्षा भयाण स्थिती आज देशात झाली आहे. आज केंद्र सरकारच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला आहे असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले.”काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीरंग चव्हाण, राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण,संतोष चाकणकर, स्वाती पोकळे, सुनीता डांगे, प्रभावती भूमकर, राजेश्वरी पाटील, शरद दबडे,भूपेंद्र मोरे, काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल मते, शिवसेना खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन वाघ आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बंदला लष्कर भागात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या भागातील व्यापारी खुल्या मनाने यात सहभागी झाले नसल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले. लष्कर भागात सकाळी आठ वाजल्यापासून बंद ला सुरुवात झाली. एम जी रोड, सेन्टर स्ट्रीट, भीमपुरा, मोदिखाना, कोळसे गल्ली, गवळी वाडा, घोरपडी आदी ठिकणी दुकाने बंद दिसली. कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपची सत्ता असतानाही बंद यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही हॉटेल्स मात्र सुरू असल्याचे दिसले.
वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात ‘संविधानाच्या’ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन (Maharashtra Bandha) च्या रॅलीला सुरुवात झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वानवडी पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आझादनगर, साळुंखे विहार, केदारीनगर, शिवरकर रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीत, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेने पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यांवरील दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते.
पुढे ही रॅली मुख्य सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकात आल्याने सोलापूर रस्त्यावरील वाहतूक खोळंबून रस्ता जाम झाला. रँलीत तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते गटागटांनी सहभागी झाले होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर रॅलीत सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर, साहिल केदारी आणि कार्यकर्ते यांच्या मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली.