सुमारे 13 वर्षे कापडावर कारागीरी करत असतांना कागदावर व्यंगचित्रकलेच्या रुपाने व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि पुढे हीच व्यंगचित्रकला जीवनाचा ध्यास होऊन गेली. गेल्या 51 वर्षांहून अधिक काळ व्यंगचित्रकला क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवलेले सुरेश सायबण्णा क्षीरसागर हे एक ज्येष्ठ व्यंगचित्रकार. महाराष्ट्रात राजकीय व्यंगचित्रकारांमध्ये त्यांचे स्थान अव्वल आहे. ठसठशीत रेषा आणि विचारांची स्पष्टता हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
सुरेश क्षीरसागर यांचा जन्म सोलापूरला 21 ऑगस्ट 1949 ला झाला. कळत्या वयात सुरुवातीला 13 वर्षे ते शिंपीकाम हा व्यवसाय करत होते. याच दरम्यान अशोक माहिमकरांच्या ‘फुलबाग’ मध्ये 1967 मध्ये त्यांचे पहिले व्यंगचित्र प्रकाशित झाले. नंतर 1980 पासून पुढे 25 वर्षे मुंबईत इंडियन एक्स्प्रेस ग्रुपमध्ये आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर आर्टिस्ट सुपरव्हायजर पदावरुन त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नवाकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, तरुण भारत, मुंबई सकाळ, इंडियन एक्स्प्रेस या दैनिकांत आणि पोलीस दलाच्या दक्षता या मासिकांत त्यांनी असंख्य व्यंगचित्रे रेखाटली. दैनिके, मासिके व नियतकालिकांत त्यांची आतापर्यंत 16 हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याशिवाय दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, राजकीय व्यंगचित्रे, अर्कचित्रे, कथाचित्रे, कॉमिक्स स्ट्रीप्स यासारखे कलाप्रकार त्यांनी सातत्याने हाताळले आहेत. व्यंगचित्र या विषयावर सप्रयोग व्याख्यान सादर करण्याचा त्यांना अनुभव आहे. दुबईच्या ‘दै. खलिज टाइम्स’ व ब्राझिलच्या ‘इडिपी’ मासिकातही त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. ‘सपाटून हसा’ हा हास्यचित्र संग्रह आणि ‘हास्यवर्दी’ हे व्यंगचित्रांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहे.
पोलीस दलाच्या ‘दक्षता’ मासिकासाठी व्यंगचित्रे रेखाटण्यासाठी निमंत्रण आले, तेव्हाचा गमतीदार प्रसंग क्षीरसागर यांनी कथन केला. आमच्या घरातील फोन वाजला आणि माझ्या पत्नीने तो उचलला’ ‘पोलिस मुख्यालयातून मी श्रीमंत जाधव बोलतोय, क्षीरसागर आहेत काय? माझ्या श्रीमतीच्या हातातून रिसीव्हर गळून पडला आणि कशीबशी मला म्हणाली ‘अहो, काय लफडं करुन ठेवलंत? कोणाविरुध्द कसलं व्यंगचित्र रेखाटलंत? बघा, घ्या! आता पोलीस स्टेशनवरुन फोन आलाय’. ‘मीही खरोखर मनातून घाबरलो. खरं तर पाचावरच धारण बसली. पण वर-वर उसनं अवसान आणून ‘अगं, मी काय केलंय? उगाच तुझं काहीतरी!’ असे म्हणत थरथरत्या हाताने रिसीव्हर कानाला लावला. मी माऊथ पीस (कानाला ऐकायची बाजू) तोंडाकडे पकडला होता आणि भीतभीतच ‘मी क्षीरसागर बोलतोय!’ असं म्हणालो. पण पलिकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून मी रिसीव्हर तोंडासमोर धरला आणि माझी चूक माझ्या नजरेत आली. तेव्हा परत रिसीव्हर फिरवून पकडला आणि संवाद साधला. पलिकडून श्री. जाधव मला व्यंगचित्र पाठवण्याबाबत बोलले तेव्हा कोठे माझा जीव भांड्यात का कशात पडला म्हणतात तसा पडला. माझा वाढलेला बीपी नॉर्मलवर आला.
दक्षता मासिकासाठी पोलिसांवरील व्यंगचित्रे रेखाटणे हे आव्हानच होते. पण ते क्षीरसागर यांनी नियमित अभ्यास, वाचनवृत्ती यांच्या सहाय्याने लिलया पेलले. पोलीस, गुन्हेगार, चोर, वकील, न्यायाधीश, खाकी वर्दी, राजकारण आणि एकंदरीत त्यातून निर्माण होऊ शकणा-या विनोदाची कल्पना करुन व्यंगचित्रे रेखाटण्यात ते यशस्वी झाले. गुन्हेगारी विश्वातील मसालेदार प्रसंगांवरील वस्तुनिष्ठ व्यंगचित्रे वाचकांना मोहीत करुन गेलीत.
ते म्हणतात, आपण दरोड्याच्या बातम्या ऐकतो. दरोडे पडतात, काहींची उकल होते. काहींची कधीच होत नाही, हे वास्तव आहे. पण म्हणून पोलिसांचे कर्तृत्व कमी लेखणं म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. पोलीस हा जनतेचा मित्र आहे. पोलिसांची संगत नको म्हणून मध्यमवर्गीयांनी दूर पळण्याची वृत्ती ठेऊन चालणार नाही. पोलिसांच्या अडचणी, दु:ख, यातना समाजाने समजून घेतल्या पाहिजेत. पोलीस हा समाजाचाच एक घटक आहे. पोलिसांनाही मन आहे. तीसुध्दा माणसेच आहेत. कर्तव्य कठोर होताना काही अतिरेक होत असेल तर त्याचा विरोध जरुर करा. पण सर्वच पोलिसांचा द्वेष करु नका. त्यांच्यातील अवगुणांचा द्वेष करा, असेही ते आवर्जून सांगतात. पोलिसांवरील व्यंगचित्रे काढणे म्हणजे त्यांच्यातील चित्तवृत्तीला हळूवार फुंकर घालणेच होते, असंही ते नम्रपणे सांगतात.
राजेंद्र सरग
9423245456