पुणे – भाषा म्हणजे केवळ बोलीभाषा नव्हे तर त्या भाषेबरोबरच त्यातील संस्कार, संस्कृतीही येते. हे ओळखूनच मल्याळम, तेलगु, बंगाली भाषिक इंग्रजी भाषा, शिकतात. त्याचा वापरही ते करतात. पण त्याचवेळी ते त्यांच्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. तसा मराठी भाषिकांनी मराठी भाषा, संस्कृती, संस्कारांचा अभिमान बाळगावा आणि आपापसात, घरात मराठीतच बोला असे, आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विचारवंत उल्हास पवार यांनी आज येथे केले. दरम्यान, राज्य शासनाने नियतकालिके ग्रंथालयानी खरेदी करावीत आणि त्यांना सरकारी जाहिराती देऊन आर्थिक पाठबळ द्यावे यासाटी आपण प्रय़त्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निवारा हॉलमध्ये झालेल्या मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणा-या “मराठी रत्न पुरस्कार” वितरण समारंभात अध्यक्षपदावरून उल्हास पवार बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे, सर्व पुरस्कारार्थी आणि माझी भाषा – भविष्याची भाषा या पुस्तकाचे लेखक व पत्रकार देवीदास देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचे मराठी रत्न पुरस्कार हंस, मोहिनी व व नवल मासिकांचे आनंद अंतरकर, मेनका माहेर व जत्रा या मासिकांचे आनंद आगाशे आणि किर्लोस्कर – स्त्री – मनोहर, अपूर्व – किस्त्रीम व बालवाडी आदी मासिकांचे विजय लेले या नियतकालिक संपादकांना पवार यांच्या हस्ते देण्यात आले. पुणेरी पगडी, पाच हजार रूपये रोख, सन्मान चिन्हं, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. “माझी भाषा – भविष्याची भाषा” या पुस्तकाचे प्रकाशन उल्हासदादा पवार व अन्य पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या सचिव निना वाडेकर यांनी पवार यांचे स्वागत केले.
उल्हास पवार म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय विधीमंडळाने घेतला आहे. खर तर कै. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व शाळात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला खाजगी इंग्रजी शाळा संस्था चालकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर सन 2004 साली सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचा मराठी सक्तीचा निर्णय योग्य़ ठरवला. त्याची अंमलबजावणी झाली आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करताना म. गांधी व अन्य नेत्यांनी इंग्रजी भाषेच्या विरोधातही आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचे समर्थन करताना म. गांधी यांनी सांगितले होते की, आपला इग्रजी भाषेला विरोध नसून, त्या भाषे बरोबर येणा-या त्यांच्या संस्कृतीला विरोध आहे आज इग्रजीच्या अट्टाहासाने काय परिस्थिती आहे ती सर्वांसमोर आहे.
मराठी शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, स्व. डॉ. वसंतराव गोवारिकर हे मराठी माध्यमातूनच शिकले आणि जागतिक स्तरावर पोचून त्यांनी मातृभाषेचे महत्व अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. हेच आज आपल्या घरातील मुलांना शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान आपापसात आणि पालकांनी घरात, कुटुंबात मराठीत बोलावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पुरस्कार्थींच्यावतीने बोलताना आनंद अंतरकर यांनी सांगितले की, नियतकालिकांच्या संपादकांचे कार्य हे आजपर्यंत उपेक्षित राहिले आहे. पण या पुरस्काराच्या निमित्ताने त्याची दखल घेतली याचे समाधान आहे. आनंद आगाशे म्हणाले, मराठीचा वाचक आजही कमी झालेला नाही. मात्र तो शहराकडून निम्न शहरांमध्ये आता विस्तारलेला आहे. त्याची दखल आज नियतकालिकांनी घेणे आवश्यक आहे. तसेच नियकालिक हे व्यक्ती केंद्रीत न ठेवता त्याला संस्थात्मक स्वरूप दिले तर ती चांगली चालून त्यांचे आर्थिक गणितही बसवता येते असा आपला गेल्या दहा वर्षातील अनुभव आहे. विजय लेले म्हणाले, दैनिकातील पुरवण्यांमुळे नियतकालिके बंद होत चालली असून असमान स्पर्धेमुळे ती यात टिकू शकत नाहीत. त्यासाठी वेगवेगळ्या नियतकालिकांनी एकत्र येऊन खर्चात कपात करण्याची गरज आहे.
पुस्तका विषयी बोलताना देवीदास देशपांडे म्हणाले, अर्थशास्त्रातील मागणी – पुरवठाचे तत्व भाषेलाही लागू आहे. सध्या इंग्रजीला मागणी जास्त असल्याने तिकडे लोकांचा कल दिसतो. पण जेव्हा इंग्रजी भाषा येणा-यांची संख्या वाढेल तेव्हा प्रादेशिक भाषा येणा-यांना महत्व येणार आहे. हीच बाब कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणातून स्पष्ट होते. संस्कृत आपली भाषा पण ती येणा-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जगातील विविध देशातील विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवणा-यांना चांगली मागणी आहे. स्वागतपर प्रस्ताविक करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे यांनी सर्वप्रथम मराठी भाषा शाळांमध्ये सक्तीचा केली बद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले. उपस्थित मराठी प्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी प्रतिष्ठान मार्फत केल्या जाणा-या उपक्रमांची महिती देऊन मराठी नियतकालिकांना राज्य शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी केली.
कार्यक्रमाला माजी आमदार दीपक पायगुडे, डॉ. सतीश देसाई, प्रकाश भोंडवे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रामाचे सूत्रसंचलन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा करूणा पाटील यानी तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या सचिव निना वाडेकर यांनी केले.