पुणे- पुण्यातील मुळशी तालुक्यात रविवारी सकाळी नदी किनारी कपडे धुताना तीन मुलांसह आई वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घटना सकाळी 11 वाजता घडली. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळवण जवळील वाळेण गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये शंकर दशरथ लायागुडे (वय.३८ वर्ष),पौर्णिमा शंकर लायगुडे ( वय.३६ वर्ष),अर्पिता शंकर लायगुडे ( वय.२० वर्ष), अंकिता शंकर लायगुडे ( वय १३ वर्ष) आणि राजश्री शंकर लायगुडे ( वय.१२ वर्ष ) यांचा वळकी नदीतील डोहामध्ये असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर हे सर्वजण वाळेन ता,मुळशी जि. पुणे येथील रहिवासी आहेत
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाळेन गावातील वळकी नदीच्या डोहामध्ये कपडे धुण्यासाठी पौर्णिमा लायगुडे ह्या महिला गेल्या होत्या.तेव्हा कपडे धुवत असताना पौर्णिमा यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या.तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या जवळ असलेल्या तीन ही मुली पाण्यामध्ये गेल्या.पण सर्व पाण्यात बुडायला लागले होते.तेव्हा हा सर्व प्रकार पोर्णिमाचे पती व त्या मुलींचे वडील शंकर लायगुडे यांनी पहिला व या सर्वांना वाचविण्यासाठी त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारली.परंतु दुर्दैवाने त्यांना सुध्दा पोहता येत नसल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी रित्या या पाच ही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तर या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला कळताच हे पथक या ठिकाणी तात्काळ आले व त्यांनी येऊन पाण्यातील पाचही जणांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले असून पुढील तपासणीसाठी हे सर्व मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.तर या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वाळेण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.