पुणे- . पीएमपीएल बस सेवा व हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्यास पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान एकूणच पुण्यात पुकारलेल्या मिनी लॉक डाऊन बाबत भाजपची पुढील भूमिका काय ते आम्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महापालिकेचे पदाधिकारी एकत्रित चर्चा करून पुढील धोरण ठरवू असे बापट म्हणाले.
बसेस व हॉटेल बंदला आमचा विरोध : खा.बापट
सार्वजनिक बसेस व हॉटेल्स बंद ठेवण्याला आमचा पूर्ण विरोध राहील. अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहरातील संचारबंदी सायंकाळी सहा ऐवजी रात्री आठ नंतर करावी. अशी मागणीही त्यांनी केली. विधान भवनात आयोजित केलेल्या कोरोना विषयक शासकीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले बैठकीला मी उपस्थित होतो. कोरोनाचे वाढते संकट आणि पेशंटची वाढणारी संख्या यावर काय करावे ? या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोरोनाचे राजकारण करू इच्छित नाही. करणारही नाही आणि केलेही नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून धरून कोरोनाच्या सर्व उपाय योजना करत असताना, हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, ऍम्ब्युलन्स हे सगळं मिळावं म्हणून या बैठकीत काही चांगल्या सूचना आल्या. पोलिसांच्या मदतीला दक्षता समित्या, एनसीसी कॅडेटस, आणि काही स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. अशी सूचना मी केली. पोलिसांनी लाठीमार न करता कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा व दंड वसूल करावा.त्यांनी कायदा हातात घेऊ नये. असे आमचे मत आहे. पोलिसांची भीती वाटली पाहिजे पण दहशत वाटता कामा नये .एखादा माणूस कामावरून घरी जात असेल किंवा मेडिकल शॉप मधील कामगार बाहेर फिरत असेल तर त्याचे आयडी प्रूफ तपासावे. त्याला त्रास देऊ नये. अशी सहकाराची भावना पोलिसांची असावी. बेड्सची संख्या वाढवावी. मेडिकल स्टुडंट्स, रिटायर्ड मेडिकल ऑफिसर, डॉक्टरांच्या संघटना यांचे सहकार्य घ्यावे. अशी आमची मागणी आहे. रोगाची तीव्रता व वाढणारे प्रमाण लक्षात घेता, आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. पोलिसांना तारतम्याने वागायला शिकले पाहिजे. शहरातील मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता हवी तेवढी लस पुरवायला केंद्र सरकार तयार आहे .मी स्वतः त्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कात आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक कव्हर होतील. असा आमचा प्रयत्न आहे. पी एम पी एल बंद होता कामा नये. त्याला आमचा विरोध राहील. तसेच हॉटेल पूर्ण बंद न ठेवता तिथं उभं राहून खायची सोय करावी. तसेच पार्सल सेवा रात्री दहापर्यंत ठेवावी. वडापाव किंवा चहाच्या हातगाड्या चालू ठेवाव्यात. तिथे पाचपेक्षा अधिक माणसांना येऊ देऊ नये. असा नियम कडकपणे पाळावा. आम्ही दुकाने बंद होऊ देणार नाही. ती आठवडाभर बंद ठेवण्यास आमचा पूर्ण विरोध आहे. तथापि धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम पूर्ण बंद ठेवावेत. या मुद्द्याला आमची सहमती आहे. जमाव बंदी व संचार बंदी यात फरक आहे. संचारबंदी रात्री आठ नंतर चालू ठेवावी व दिवसा जमाव बंदीची अंमलबजावणी करावी. नियमांत कठोर पालन करून लोकांचं नॉर्मल जीवन चाललं पाहिजे. शिस्त पाळून समाज जीवन चांगलं राहायला पाहिजे. अशी आमची धारणा आहे. जनतेला काहीही न देता राज्य शासन संचार बंदीतून दैनंदिन जीवन थांबविणार असेल, तर फार मोठी आर्थिक कोंडी होईल अशी भीती आम्हाला वाटते. म्हणून रुटीन न बिघडवता कडक निर्बंध लावा. अशी आमची मागणी आहे