पुणे- प्रख्यात नृत्यांगना अभिनेत्री हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये बॅले सादर करण्याची परंपरा यावर्षीही
कायम राखत त्यांनी सादर केलेल्या ‘गंगा’ या नृत्यनाट्य आविष्काराने रसिकांवर आनंदाची बरसात केली. गंगा
नदीच्या प्रकटण्याची पौराणिक कथा मांडतानाच आजच्या घडीला गंगा नदीसह सर्वच नद्यांचे रक्षण आणि
संवर्धन करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
भगवान विष्णूंच्या पायातून प्रकट झालेल्या गंगेला पृथ्वीवर मानवकल्याणासाठी येण्याची गरज निर्माण झाली.
ती पुढे निघाल्यावर शंकराने तांडवनृत्य करीत तिला आपल्या जटांमध्ये बंदिस्त केले. तिचा वेग नियंत्रित करून
तिला भूतलावर धाडले. सतयुग, त्रातायुग, द्वापरयुग असा कठीन प्रवास करीत गंगा आता कलियुगात आली
आहे. पण या काळात विविध खलपुरुषांनी गंगेवर आणि त्यायोगे समाजावर अत्याचार केले. गंगेला पुन्हा
स्वर्गात जावेसे वाटले तरी मानव उद्धाराचे कार्य करण्यासाठी ती पृथ्वीवर आहे. तिचे रक्षण करणे हे आपले
काम आहे असा संदेश या बॅलेतून मिळतो.
हेमामालिनी यांच्या नाट्यविहार कलाकेंद्र या संस्थेच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यंद
भव्य अशा मंचावर दृकश्राव्य पद्धतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे सौंदर्यच आगळेवेगळे होते. भव्यता हा
कार्यक्रमाचा आत्मा आहे तर शब्द, सूर, ताल याचा अनोखा संगम प्रेक्षकांनी अनुभवला. गंगेच्या रुपात
हेमामालिनी प्रकट होतात तो झुला १० फुट उंचीवर आहे. तेथून स्वत:चा तोल सांभाळतानाच एकंदर
कार्यक्रमाचा ताल सांभाळणे हे कठीण काम कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी केले तेव्हा क्षणाक्षणाला आनंदाच्या
लहरी निर्माण होत होत्या.
रंगमंचावर क्षणाक्षणाला बदलणारा प्रसंग सादर करताना राखलेला ताल अप्रतिम होता. गंगेचा प्रवास
वेगवेगळ्या युगात कसा होत होता याचे तपशील निवेदन आणि नृत्य यातून उलगडत होते. त्याला देखण्या
नृत्याची जोड क्षणोक्षणी मिळत होती.
आज हयात नसलेले गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी शब्द आणि सूर यांचा सुरेख संगम साधला
असून कविता कृष्णमुर्ती आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजांचा सुरेख संगम या कार्यक्रमाची रंगत वाढवतो.
शंकर महादेवन, मिका सिंह, रेखा राव, हेमा देसाई आणि आलाप देसाई यांच्याही आवाजाचा सुंदर उपयोग
करून घेतलेला आहे. रवींद्र जैन यांना आशीत देसाई आणि आलाप देसाई यांची साथ मिळाली आहे. नृत्य
दिग्दर्शन भूषण लखांद्री यांनी प्रत्येक पात्रास प्रकट करणाऱ्या सुंदर स्टेप्स दिल्या आहेत. वेशभूषा तर कमालाच
असून राम गोविंद यांच्या संशोधनातून खरे तपशील रसिकांपुढे येतात. शेखर आसीव यांनीही काही गीते
लिहिली आहेत.
हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये सादर केलेला हा २८ वा बॅले होता. हेमा मालिनी सादर केलेली नृत्ये
आणि साधलेला ताल विलोभनीय होता. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना पुणे शहराने आजवर जो स्नेह दिला
त्यामुळे आपण भारावून गेल्याचे सांगितले.
पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते हेमामालिनी आणि अन्य कलाकारांचा सत्कार करण्यात
आला. डॉ. सतीश देसाई यांनी महोत्सवाच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा सादर केला. यावेळी सौ. मीरा
कलमाडी, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, या बॅलेचे कोरीओग्राफर भूषण लखांद्री हे यावेळी उपस्थित
होते.
प्रेक्षकांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती.