हास्य, वेदना, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय विडंबनाने गाजले मराठी कवी संमेलन
पुणे—सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांतरावर विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या
हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला लावणारे समाजातील, राजकारणातील वास्तव, स्रीच्या जीवनातील
वास्तव यांवर केलेल्या रचना आणि प्रेम कवितांना श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला
उत्स्फूर्त प्रतिसाद, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मराठी कविसंमेलन गाजले.
पुणे फेस्टिवलचे माजी मुख्य संयोजक स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या आठवणींना उजाळा देत आणि त्यांना
श्रद्धांजली अर्पण करून संमेलनाला प्रारंभ झाला.
पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि पुणे फेस्टिवलचे डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते पहिला स्व.
कृष्णकांत कुदळे पुरस्कार कवी नितीन देशमुख यांना यावेळी प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख,
शाल आणि स्मृतीचित्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी निश्चल आनंद, नीला अहुवालिया, राहुल
वंजारी, काका धर्मावत, दिपाली पांढरे, रवी चौधरी, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे, राज्य महामार्गाचे पोलीस
अधीक्षक मोहिते, श्रीकांत आगस्ते यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला.
रामदास फुटाणे यांच्या प्रारंभीच
ऐकून घेणे आजकालच्या राज्यकर्त्यांना जमत नाही
ऐकून फक्त एकाचेच घेतात, ज्यांना ते पक्षात घेतात
आणि
जेव्हा जेव्हा मन भूतकाळाकडे वळतं
मोगलांनी धर्मांतरे कशी केली, ते पक्षांतरामुळे कळतं..
या सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरील केलेल्या कोटीला प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून
दाद दिली.
बुडत्या जहाजातून उंदीर उडी मारून बाहेर पडत होता
ते पाहून गणपती पायाजवळच्या उंदराला म्हणाला
दहा दिवसानंतर मला बुडवणार आहे तू का जात नाहीस
उंदीर म्हणाला बुडण्याची भीती नाही, मी पक्षांतरासारखे कसे वागेन
मी बुडेपर्यंत जगेन..
या फुटाणे यांच्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या प्रवृत्तीवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या रचनेला प्रेक्षकांनी
जोरदार प्रतिसाद देत सभागृह टाळ्यांनी डोक्यावर घेतले.
शिक्रापूर येथील भरत दौंडकर यांनी,
कावळे उडाले स्वामी,
पक्ष श्राद्धाला थांबूनही निवद मिळत नाही,याची कोण देतो हमी,
नवीन पिंडाच्या शोधात कावले उडाले स्वामी…
ही रचना सदर करत येत्या काही वर्षांत सामाजिक, राजकीय बदल आपल्याला कुठे घेवून जाणार आहे यावर
प्रकाश टाकला व रसिकांना अंतर्मुख केले.
अनिल दिखित यांनी, ‘मिश्कील नेत्याची, मिश्कील पत्र’ही रचना सादर केली.
जीव लावतो कमळाबाई आम्ही तुमच्यावर
जागा वाटपावरून बसता आमच्या मानगुटीवर
मी घरात राहू की नको, काय ते पत्रात लिव्हा.
दुसर्यांच्या कार्यकर्त्यांनी भरले आपले घर
भिती वाटते आपलीच पोरं येतील रस्त्यावर
त्यांना दत्तक घेवू का नको, काय ते पत्रात लिव्हा
या त्यांच्या राजकीय कैफियतीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
प्राचार्य सुरेश शिंदे यांनी
बाभळीला बोरं झाली की, माकडाला पोरं झाली
‘अच्छेदिन’;मन की बात’ वांझोटीची थेरं झाली
‘सबका साथ, सबका विकास’
तहानलेल्याला नाही पाणी, भुकेलेल्याला नाही घास... ही रचना सादर करून प्रेक्षकांना
अंतर्मुख केले.
अशोक थोरात यांनी सा दर केलेल्या
धोधो पाणी वाहत आहे तिच्या घरी
ती न्हात आहे, इथे मनाच्या खिडकीमधून मी सारे काही पाहत आहे
दिसतो तरी असा मी साधा म्हणू नको,
मरतो तुझ्यावरती गं, दादा म्हणू नकोस..
या प्रेम कवितेला प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी
निळ्या मखमली पंखाचे, शुभ्र नाजूक नक्षीचे
गाणे गुनगावे तसे फुलपाखरू खिडकीतून आले
गरगरणाऱ्या पंख्याच्या पंख्यांच्या पात्यांनी
त्याचे इवलेशे पंख कापले..
भेलकांडत, गिरक्या घेत.. फुलपाखरू जमिनीवर पडले…..
दुसर्या दिवशी उकीरड्याचे धन झाले.
ही इमारत बांधण्यापूर्वी पुष्कळ फुलपाखरे होती म्हणतात..
ही सामाजिक आशयाची रचना सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
अरुण म्हात्रे यांनी
नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात
नुसत्याच मुक्या भिंतींना सावल्या तुझ्या छळतात
नुसत्याच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो
नुसताच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो
ही प्रेमकविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
नितीन देशमुख यांनी सादर केलेल्या
आज माझे दुख:ही हरवून गेले
दोन अश्रू लोचनी तरळून गेले
ऐकला आवाज मी पाकळ्यांचा
फुल माझ्या एवढे जवळून गेले
ही गझल सादर केली.
कवियत्री मृणाल कानेटकर- जोशी, महेश केळुस्कर, नारायण पुरी, तुकाराम धांडे, बंडा जोशी, रमजान मुल्ला,
यांनी सादर केलेल्या रचनांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली.